)
1990चं दशक बॉलिवूडसाठी ग्लॅमर, रोमँस आणि स्टारडमचं सुवर्णयुग मानलं जातं. त्या काळात फक्त चित्रपटच नव्हे तर सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याच्याही बातम्या तितक्याच चर्चेत असायच्या. त्याच काळात सर्वाधिक चर्चेत असलेलं अफेअर म्हणजे अजय देवगण आणि रवीना टंडनचं नातं. त्या काळी रवीना टंडन बॉलिवूडची टॉप हिरोइन होती, तर अजय देवगण आपली ओळख ॲक्शन हिरो म्हणून मजबूत करत होता. दोघे 1994 मध्ये आलेल्या ‘दिलवाले’ या अॅक्शन-रोमँटिक चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जवळ आले. सेटवरूनच त्यांच्या नात्याच्या चर्चेला सुरुवात झाली. चाहत्यांनाही त्यांची जोडी आवडू लागली होती.
पण काही वर्षांतच हे नातं बिघडलं. त्याच काळात रवीना टंडनचं नाव अक्षय कुमारसोबत जोडलं जाऊ लागलं. अक्षयसोबत तिचा साखरपुडा झाल्याचंही त्या काळात गाजलं, मात्र तोही फार काळ टिकला नाही. अक्षयने नंतर करिश्मा कपूरच्या प्रेमात पडल्यामुळे रवीना आणि अक्षय यांचं नातं तुटलं. या भावनिक काळात रवीना आणि अजयमध्येही मतभेद वाढले. काही रिपोर्ट्सनुसार, अजयने रवीनाला प्रेमपत्र लिहिलं होतं, ज्याचा उल्लेख अभिनेत्रीने मुलाखतीत केला. मात्र अजयने ते पत्र दाखवण्याचं आव्हान दिलं आणि या सर्व गोष्टींना 'खोटं आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न' असं म्हटलं.
1994मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत अजयने या प्रकरणावर स्पष्टपणे आपली भूमिका मांडली होती. त्याने रवीनेवर जोरदार टीका करताना म्हटलं होतं 'प्रत्येकाला माहित आहे की ती जन्मतःच खोटारडी आहे. तिची हास्यास्पद विधानं मला अजिबात महत्त्वाची वाटत नाहीत.' अजय इथेच थांबला नाही. त्याने पुढे सांगितलं 'या वेळी तिने सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. माझा सल्ला असा आहे की ती ताबडतोब मानसोपचारतज्ज्ञाकडे जावी आणि आपलं डोकं तपासून घ्यावं. नाहीतर तिला मानसिक रुग्णालयात दाखल केलं जाईल.'
या वक्तव्यांमुळे त्या काळी संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. काही मीडियात रवीनेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचंही लिहिलं गेलं, मात्र रवीना टंडनने नंतर या सगळ्या अफवांचं जोरदार खंडन केलं. अभिनेत्रीने म्हटलं 'मी कधीच आत्महत्येचा प्रयत्न केला नाही. त्या सगळ्या अफवा खोट्या आणि सनसनाटी आहेत. माझं करिअर आणि वैयक्तिक आयुष्य यांना वेगळं ठेवायचं ठरवलं आहे.' या वादानंतर दोघांनी एकमेकांबद्दल कोणतीही सार्वजनिक टिप्पणी केली नाही. मात्र, या प्रकरणानंतर रवीना आणि अजय दोघांनीही आपआपल्या आयुष्यात पुढे पाऊल टाकलं. 1999 साली अजय देवगणने अभिनेत्री काजोलशी लग्न केलं आणि आज ते दोन मुलांचे आई-वडील आहेत. दुसरीकडे, रवीना टंडनने २००४ साली चित्रपट वितरक अनिल थडानीशी लग्न केलं. दोघांना राशा आणि रणबीरवर्धन अशी दोन मुलं आहेत. विशेष म्हणजे, आता रवीनेची मुलगी राशा टंडन बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे.
आज रवीना टंडन एक यशस्वी अभिनेत्री, समाजसेविका आणि टेलिव्हिजन व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखली जाते. तर अजय देवगण अजूनही बॉलिवूडमधील सर्वाधिक आदरनीय आणि यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यांचं हे जुने नातं आणि त्यावरून निर्माण झालेल्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करतात.
FAQ
अजय देवगण आणि रवीना टंडनचं अफेअर कधी सुरू झालं?
1994मध्ये ‘दिलवाले’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची जवळीक वाढली आणि त्याच काळात त्यांनी डेट करायला सुरुवात केली.
रवीना टंडनने खरोखर आत्महत्येचा प्रयत्न केला होता का?
नाही. रवीना टंडनने आत्महत्येच्या सर्व अफवांचं जोरदार खंडन केलं आणि त्या बातम्या खोट्या असल्याचं स्पष्ट केलं.
आता रवीना टंडन आणि अजय देवगण कुठे आहेत?
दोघेही आपल्या वैवाहिक आणि व्यावसायिक आयुष्यात व्यस्त आहेत. रवीना विविध चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करते, तर अजय देवगण निर्माता-दिग्दर्शक म्हणूनही सक्रिय आहे.