)
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुमुखी दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता महेश मांजरेकर यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या गाजलेल्या चित्रपटानंतर आता त्याचाच पुढचा भाग ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत (एबीपी माझा) त्यांनी सध्याच्या मनोरंजन विश्वाविषयी आणि एआय (Artificial Intelligence) च्या वाढत्या प्रभावाविषयी थेट आणि धक्कादायक मत व्यक्त केलं आहे.
महेश मांजरेकर म्हणाले 'हिरोची हिरोगिरी आता कमी झाली आहे. आजच्या काळात कंटेंटच सर्वकाही आहे. पण मला वाटतं की पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल. कारण एआयने सगळं टेकओव्हर केलंय. तुम्ही युट्यूबवर काही एआय-निर्मित ट्रेलर्स पाहिलेत तर लक्षात येईल तिथे जे व्हिज्युअल्स दिसतात, ते कॅमेऱ्यात कैद करणं जवळपास अशक्य आहे. एआयमुळे चित्रपट निर्मितीची मर्यादा संपली आहे.'
ते पुढे म्हणाले 'मी सहा महिन्यांपूर्वी पाहिलेलं एआय आणि आत्ताचं एआय यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. ज्या दिवशी एआय कोड पूर्णपणे क्रॅक करेल, त्या दिवशी आपण सगळे संपलो. मी अलीकडेच ‘महाभारत’चा एआय ट्रेलर पाहिला. डोळे दिपवणारा होता. त्यात 3D, 4D असे अनेक पर्याय होते. मग लोकं पैसे देऊन कलाकारांना थिएटरमध्ये का पाहतील? एआय खरोखरच धोकादायक आहे.'
मांजरेकरांनी पुढे उदाहरण देत सांगितले 'सिनेमा बनवायची प्रक्रिया आधी मॅन्युअल होती. कॅमेरा, लाईट, कलाकार, सेट्स सगळं प्रत्यक्षात घडायचं. पण आता ते बदललंय. माझ्या एका मित्राने मला सांगितलं की तो एआयवर अॅड फिल्म बनवत होता. त्याला ती तयार करायला फक्त २ हजार रुपये खर्च आला आणि त्याला ५० हजार रुपये मिळाले. म्हणजेच, खर्च कमी आणि परिणाम दहा पटीने चांगला!' ते पुढे म्हणाले, 'रोज 10 हजार सिनेमे तयार होतील, तेही काही हजारांत. एंटरटेन्मेंट आता थिएटरकडे परत यायला हवं, कारण सिनेमा हळूहळू संपत चाललाय. माझं भाकीत आहे ‘पुढच्या दीड वर्षात सिनेमा संपेल, कारण एआय दहा पटीने चांगलं देणार आहे.’
या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरही चर्चांना उधाण आलं आहे. अनेकांनी मांजरेकरांच्या मताशी सहमती दर्शवली, तर काहींनी हे भाकीत अतिशयोक्तीपूर्ण असल्याचं मत मांडलं. मात्र एक गोष्ट निश्चित — एआयमुळे सिनेमा विश्वात मोठा बदल घडणार, याबाबत कोणीही शंका घेत नाही.
FAQ
'पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या सिनेमात नेमकं काय दाखवण्यात आलं आहे?
हा सिनेमा शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांच्या संघर्षाचं वास्तव आणि समाजातील बदलत्या परिस्थितीवर भाष्य करतो. तो केवळ ऐतिहासिक नाही, तर सामाजिक संदेश देणारा आधुनिक कथानक आहे.
महेश मांजरेकरांना एआयमुळे सिनेमा संपेल असं का वाटतं?
त्यांच्या मते, एआयमुळे व्हिज्युअल्स अधिक आकर्षक, खर्च कमी आणि उत्पादन जलद झालं आहे. त्यामुळे लोकांना पारंपरिक चित्रपटांची आवश्यकता उरणार नाही.
एआयचा सध्याच्या सिनेसृष्टीवर काय परिणाम दिसतोय?
आज अनेक निर्माते आणि जाहिरातदार एआयच्या मदतीने ट्रेलर्स, अॅड फिल्म्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स तयार करत आहेत. भविष्यात या तंत्रज्ञानामुळे कलाकार, कॅमेरामन आणि दिग्दर्शकांच्या भूमिकांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.