Phule Movie : मागील काही वर्षांपासून कलाविश्वामध्ये कलाकारांनी आपआपल्या परिनं काही संवेदनशील मुद्दे हाताळत कलाविष्कार सादर केले असले तरीही त्यांच्या या कलेला सतत वेसण घालण्याचं काम सेन्सॉर बोर्डानं केल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता आणखी एका विषयाची भर पडली असून, हा विषय म्हणजे प्रदर्शित होण्यासाठी सज्ज असणारा चित्रपट, 'फुले'.
अनंत महादेवन दिग्दर्शित या चित्रपटावरून सुरू असणाऱ्या वादामध्ये आता आपल्या परखड मतांसाठी ओळखल्या जाणाऱ्या निर्माता- दिग्दर्शक अनुराग कश्यप यानंसुद्धा उडी घेतली असून या संपूर्ण परिस्थितीसंदर्भात त्यानं चिंतेचा सूर आळवला आहे. प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटामुळं जातीयवादी तणावात भर टाकण्याचं काम केलं जात असल्याचं म्हणजे अनेकांनीच टीकेची झोड उठवली आहे. याच धर्तीवर सेन्सॉर बोर्डानं हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यातून सदरील दृश्यांवर कात्री मारण्याचे निर्देशही दिले आहेत. ज्यामुळं सोशल मीडियावर काही कलाकार मंडळींनी सेन्सॉरच्या या भूमिकेवरच ताशेरे ओढल्याचं पाहायला मिळालं, अनुराग कश्यपची प्रतिक्रियासुद्धा त्याचाच एक भाग.
यापूर्वीच चित्रपटातून सीबीएफसीच्या सांगण्यावरून काही संदर्भ हटवण्यात आले. पण, तरीही ही भूमिका न बदलल्यानमुळं अनुरागनं इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली. 'पंजाब 95, तीस, धडक 2, फुले.... मला नाही ठाऊक असे किती चित्रपट आहेत जे जातीय भेदभाव, क्षेत्रवादी, वर्णभेद अशा गोष्टींवर उजेड टाकतात आणि याच चित्रपटांवर सेन्सॉर बंदी आणतं. ज्यांना आपला स्वत:चाच चेहरा आरशात पाहण्याचीही लाज वाटते, इतकी की ते मोकळेपणानं बोलूही शकत नाहीत... तर मग चित्रपटांमध्ये असं काय आहे की जे त्यांना इतकं अस्वस्थ करतंय? निरर्थक आहे हे सगळं... ' असं त्यानं पोस्टमध्ये लिहिलं.
दुसऱ्या एका पोस्टमध्ये तो लिहितो, 'माझा प्रश्न असा आहे, की जेव्हा एखादा चित्रपट सेन्सॉरशिपसाठी बोर्डाकडे जातो तेव्हा तिथं चार सदस्य असतात. तर मग वेगवेगळ्या संघटना आणि समुदायांपर्यंत ही बाब पोहोचतेच कशी? याची कोणालाही परवानगीच नसते. ही पूर्ण व्यवस्थाच गोंधळलेली आहे.'
सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेवर ताशेरे ओढत अनुरागनं इन्स्टाग्रामवर आणखी एक लांबलचक पोस्टसुद्धा लिहिली, जिथं त्याचा संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. एका कलाकृतीपुढं येणाऱ्या या अडचणी पाहता भारतासारख्या देशाल कलेप्रती वाढणारी ही बंधनं आता कलाकारांचीच गळचेपी करत आहेत असाच सूर अनेक मंडळी आळवताना दिसत आहेत.