)
Disha Patani Home Aniruddhacharya Premanand Maharaj Comment: अभिनेत्री दिशा पटानीच्या घराबाहेर शुक्रवारी रात्री उशीरा गोळीबार झाला. उत्तर प्रदेशमधील बरेलीतील सिव्हिल लाईन्स येथील दिशाच्या घरावर गोळीबार करण्यात आला. रोहित गोल्डी ब्रार गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून सोशल मीडियावर पोस्ट करताना हिंदू संत प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य महाराज यांच्यासंदर्भात दिशाच्या बहिणीने केलेल्या टीकेवरुन इशारा देत हा हल्ला करण्यात आला आहे. मात्र प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य महाराज यांनी असं नेमकं काय म्हटलं होतं की ज्यावरुन दिशाच्या बहिणीने त्यांच्यावर टीका केली होती, हे अनेकांना ठाऊक नाही. म्हणूनच या साऱ्या प्रकरणाशी या दोन साधू संतांनी केलेल्या कोणत्या विधानांचा संदर्भ आहे हे जाणून घेऊयात...
गँगस्टर रोहित गोदाराने अभिनेत्रीच्या घरावर गोळीबाराची जबाबदारी स्वीकारताना एका पोस्ट लिहिली आहे. "आज खुशबू पटानी/दिशा पटानी (बॉलिवूड अभिनेत्री) यांच्या घरावर (व्हिला क्रमांक 40, सिव्हिल लाईन्स, बरेली, उत्तर प्रदेश) आम्ही म्हणजेच मी, वीरेंद्र चरण, महेंद्र सरन (डेलाना) यांनी गोळीबार केला. त्यांनी (पटानी बहिणींनी) आमच्या पूज्य संतांचा (प्रेमानंदजी महाराज आणि अनिरुद्धाचार्यजी महाराज यांचा) अपमान केला आहे. त्यांनी आमच्या सनातन धर्माचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे," असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तसेच, "आमच्या देव-देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही. हा फक्त एक ट्रेलर होता. पुढच्या वेळी जर त्यांनी किंवा इतर कोणी आमच्या धर्माचा अनादर केला तर त्यांच्या घरात कोणीही राहणार नाही," असं रोहित गोदराने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दिशाची थोरली बहीण खुशबू ही एक माजी लष्करी अधिकारी आहे. खुशबू अनेक सामाजिक मुद्द्यावर लोकांमध्ये उघडपणे आपले विचार मांडते. तिने अनिरुद्धाचार्य यांनी केलेल्या विधानांवरही तीव्र प्रतिक्रिया नोंदवली होती. अनिरुद्धाचार्य यांचे एक विधान सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते, ज्यामध्ये त्यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या लोकांबद्दल नकारात्मक विधान केले होते. तथापि, खुशबूने या व्हिडिओवरुन टीका होऊ लागल्यानंतर स्पष्टीकरणही दिलं होतं. खुशबूचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काही लोकांनी तिच्या विधानाचा संदर्भ त्याच काळात व्हायरल झालेल्या प्रेमानंदजी महाराजांच्या विधानाशी जोडला. त्यानंतर सोशल मीडियावर खुशबूला खूप ट्रोल करण्यात आले. मात्र, खुशबूने या प्रकरणात तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक निवेदन जारी केले. आपण प्रेमानंदजी महाराजांबद्दल काहीही विधान केलेले नाही, असं तिने म्हटलेलं. "असे ऐकले आहे की काही लोक माझ्याबद्दल खोट्या अफवा पसरवत आहेत की मी आध्यात्मिक गुरू प्रेमानंद जी महाराजांबद्दल वाईट बोलले," अशी इन्स्टाग्रामवर खुशबूने पोस्ट केली होती.
आता या साऱ्या हल्लाप्रकरणामध्ये असलेली दोन विधानं नेमकी कोणती? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर अनिरुद्धचार्य यांनी महिलांबद्दल वादग्रस्त विधान करताना महिला या शोभेच्या वस्तू असल्याचं म्हटलेलं. महिलांची उपस्थिती ही 'शो-पीस'सारखी असते. त्यामुळे त्यांनी कमी वेळ मंचावर राहिलेलं बरं, असं विधान अनिरुद्धचार्यांनी केलं होतं. त्यानंतर अनेकांनी या विधानावरुन संताप व्यक्त केलेला. या विधानाची दखल महिला आयोगानेही घेतली होती. महिला आयोगाने सदर प्रकरणात अनिरुद्धचार्यांना थेट नोटीस पाठवली होती.
वृंदावनमधील प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांचा एक व्हिडीओ साधारणपणे महिन्याभरापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये प्रेमानंद महाराजांनी, "हल्ली 100 पैकी 2 ते 4 मुली पवित्र असतात. बाकी सगळ्या बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडच्या नादात अडकलेल्या असतात," असं विधान केलं होतं. एका खासगी चर्चेत प्रेमानंद महाराजांनी हे विधान केलेलं. मात्र त्याचा कोणीतरी व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर हा मुद्दा वादाचा विषय झाला होता.