)
गेल्या काही दिवसांत छोट्या पडद्यावरील अनेक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. त्याचबरोबर काही कलाकारांनीही आपली लोकप्रिय पात्रं सोडली आहेत. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘शुभविवाह’ सध्या रंजक वळणावर असतानाच मालिकेतील महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने मालिकेला अलविदा केला आहे. मधुरी देशपांडे, यशोमन आपटे आणि विशाखा सुभेदार यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेत पौर्णिमा पटवर्धन म्हणजेच ‘पुन्नो’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री कुंजिका काळविंट (Kunjika Kalwanit) हिने मालिकेतून ब्रेक घेतल्याची घोषणा केली आहे. अलीकडेच कुंजिकाने आपल्या चाहत्यांना गोड बातमी दिली होती. ती लवकरच आई होणार असून नुकतंच तिचं डोहाळजेवण पार पडलं. त्यामुळे तिने सध्या अभिनयातून थोडा ब्रेक घ्यायचं ठरवलं आहे. सोशल मीडियावर मोठी पोस्ट शेअर करत कुंजिकाने आपल्या प्रवासाबद्दल भावना व्यक्त केल्या.
ती म्हणाली, 'गेल्या तीन वर्षांपासून पौर्णिमा म्हणजेच पुन्नो माझ्या दैनंदिन आयुष्याचा भाग होती. या भूमिकेपलीकडेही माझी एक वेगळी ओळख तयार झाली होती. आज पुन्नो म्हणून माझा शेवटचा दिवस होता हे कटू सत्य आहे. पण हा शेवट नाही; उलट जोवर पुन्हा सगळं जुळून येत नाही तोवर घेतलेला हा एक सुंदर ब्रेक आहे.' पुढे ती म्हणाली, "या खास शोचा मी भाग झाले हे माझं भाग्य आहे. निरोप घेताना मन जड झालं आहे, पण माझं हृदय आभार, प्रेम आणि सुंदर आठवणींनी भरलं आहे. या आठवणी मी कायमसोबत घेऊन जाईन.' कुंजिकाच्या या पोस्टवर चाहत्यांनी तिला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिच्या आठवणी कायम राहतील असं म्हटलं आहे. आता प्रेक्षकांच्या मनात प्रश्न आहे की, कुंजिकाच्या जागी नवी अभिनेत्री येणार का? की ही मालिका लवकरच संपणार, अशीही चर्चा रंगली आहे.
FAQ
कुंजिका काळविंटने ‘शुभविवाह’ मालिका का सोडली?
कुंजिका काळविंट लवकरच आई होणार असून मातृत्वाचा आनंद घेण्यासाठी तिने अभिनयातून ब्रेक घेतला आहे.
कुंजिकाची मालिकेतील भूमिका कोणती होती?
तिने पौर्णिमा पटवर्धन उर्फ ‘पुन्नो’ ही भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली.
आता ‘शुभविवाह’ मालिकेत कुंजिकाच्या जागी कोण येणार?
अद्याप निर्मात्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे नवा चेहरा येईल की मालिका संपणार याची उत्सुकता अजून कायम आहे.