Sudhir Mungantiwar: भाजपचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते, आमदार सुधीर मुनगंटीवारांना राज्याच्या मंत्रिंडळातून डावलण्यात आले होते. केंद्राने मुनगंटीवार यांच्याबाबत काहीतरी विचार करुनच मंत्रिमंडळात घेतलं नसेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. कालपर्यंत नाव असताना ते नाव कमी का केलं? हे मला माहिती नाही अशी शंका मुनगंटीवार यांनी उपस्थित केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. त्यात सुधीर मुनगंटीवारांनी अनेक विधाने करुन आपल्याच सरकारला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं. पण सुधीर मुनगंटीवार भाजपमध्ये खरंच नाराज आहेत का? ते आपल्याच सरकारमध्ये सेल्फ गोल करताना का दिसतात? नाराजी का व्यक्त करतात? 'झी 24 तास'च्या 'टू द पॉइंट' कार्यक्रमात या सर्व प्रश्नांची उत्तरे सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहेत.
मी सरकारमध्ये कधीच नाराजी व्यक्त करत नाही. मी धोरणांवर बोलतो. मी कधीच वैयक्तिक टीका करत नाही. याआधीदेखील कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केलीय. मी सभागृहात जनतेंचे प्रश्न मांडण्यासाठी आलोय. मी माझ्या आयुधांचा उपयोग केला नाही तर जनतेशी प्रतारणा होईल, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
मी सरकारमधील उणीवा,त्रुटी दाखवतो सार्वजनिक क्षेत्रातील उणीवा दूर करण्यासाठी काम करतो पण वैयक्तिक टीका करत नाही, असे स्पष्टीकरण सुधीर मुनगंटीवार यांनी दिलंय. 'झी 24 तास'च्या 'टू द पॉईंट' कार्यक्रमातून मुनगंटीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या आधीही मी संसदीय आयुधांचा वापर केलाय. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी भूमिका घेतो, असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना भाजप आमदार सुधीर मुंनगंटीवार यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली होती. कृषी विभागाच्या एका उत्तरावर मुनगंटीवार संतापले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की मी देखील चुकीने काही काळ मंत्री होतो.मुनगंटीवारांच्या या विधानावरून सभागृहात जोरदार टोलेबाजी रंगल्याचं पाहायला मिळालं. भाजपने मंत्रिपद डावललेले आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत बोलताना आपल्या मनातील खदखद बोलून दाखवलीय. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत बोलताना माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना मी ही चुकून मंत्री होतो असं विधान केलं. यावरून विधानसभेतील सदस्यांनी टोलेबाजी केली. मात्र या विधानामुळे बोलता बोलता मुनगंटीवार यांनी आपल्या मनातील खदखदच बोलून दाखवलीय. 2014 ते 2019 आणि त्यानंतर 2022 ते 2024 पर्यंत मुनगंटीवार मंत्री होते. मात्र 2024 च्या निवडणुकीनंतर त्यांना वगळण्यात आल्यानं ते नाराज आहेत.