Indian BSF Jawan Detained By Pakistani Rangers: जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेने सर्वांना हादरवून टाकलं असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानदरम्याचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. यादरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. यादरम्यान पंजाबमध्ये एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका जवानाने चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली. चुकून पाकिस्तानच्या सीमाभागात गेलेल्या भारताच्या या बीएएसएफ जवानाला पाकिस्तानी रेंजर्सनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी फिरोजपूरजवळ घडली आहे. बीएसएफच्या गणवेशात असलेले कॉन्स्टेबल पीके सिंग अंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गेले. कॉन्स्टेबल पीके सिंग हे पाकिस्तानच्या सीमेत शिरले तेव्हा त्यांच्या हातात सर्व्हिस रायफल होती. 82 व्या बटालियनमध्ये कॉन्स्टेबल असलेले पीके सिंग हे एका स्थानिक शेतकऱ्यांबरोबर सावली शोधत असताना चुकून सीमेच्या पलीकडे गेल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानच्या बाजूने सीमारेषेजवळ गवताच्या कुरणावर काम करत असलेल्या शेतकऱ्यांवर पीके सिंग लक्ष ठेऊन होते. त्यावेळी ते चुकून पाकिस्तानच्या सीमा भागात गेले. या भागात असलेल्या झीरो लाइनजवळ शेतकऱ्यांना विशेष परवानगी घेऊन शेती करण्याची परवानगी दिली जाते. मात्र अशावेळी या शेतकऱ्यांबरोबर बीएसएफचे जवान असतात. या सैनिकांना किसान गार्ड असंही म्हणतात. झिरो लाइनच्या काही अंतर आधी तारा लावलेल्या असतात. मात्र पाकिस्तानने त्यांच्या बाजूने असलेल्या झिरो लाइनवर तारा लावलेल्या नसल्याने पीके सिंग चुकून ही सीमारेषा ओलांडून पलीकडे गेले.
नक्की वाचा >> 'बदला घेणार, पण कसा?' ठाकरेंच्या शिवसेनेचा मोदी-शहांना सवाल; म्हणाले, 'दुबईत...'
नो मॅन्स लॅण्ड म्हणजेच दोन्हीकडील कोणत्याही अधिकारी किंवा सैनिकांना प्रवेशाची परवानगी नसलेल्या भागात गेलेल्या पीके सिंग यांना पाकिस्तानी रेंजर्सने ताब्यात घेतलं. पीके सिंग यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना पाकिस्तानी रेंजर्सने बंधकाप्रमाणे ठेवल्याचे फोटो समोर आले आहेत.
A jawan of the Border Security Force (BSF) was detained by Pakistani Rangers on Wednesday, April 23, after he accidentally crossed the international border in Firozpur of Punjab, while on duty. A flag meeting has been called to ensure the safe return of the jawan, said a senior…
— ANI (@ANI) April 24, 2025
त्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी दोन्ही देशांच्या सीमा दलांमध्ये संवाद सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बीएसएफ जवनाला सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी दोन्ही देशांमधील अधिकाऱ्यांमध्ये फ्लॅग मिटींग्स सुरु आहेत. अशाप्रकारे एखाद्या सैनिकाने चुकून सीमा ओलांडून जाणं ही सामान्य बाब आहे.
नक्की वाचा >> महाराष्ट्रात घडू शकते पहलगामसारखी घटना? 'या' जिल्ह्यात 700+ पाकिस्तान्यांचं बेकायदेशीर वास्तव्य
यापूर्वीही दोन्ही बाजूने असं घडलं असून अनेकदा अशा सैनिकांना मायदेशी परत पाठवलं जातं, असं अधिकाऱ्यांनी नमूद केलं. मात्र आता पहलगाम प्रकरणानंतर दोन्ही देशांमधील संबंध तापलेले असल्याने पीके सिंग यांची सुटका कधी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.