)
अमरनाथ येथील बर्फाचे शिवलिंग यंदाच्या वर्षी अवघ्या पाच दिवसांतच वितळले आहे. गेल्या वर्षी यात्रा सुरू झाल्यानंतर आठ दिवसांनंतर हे शिवलिंग वितळले होते. क्षमतेपेक्षा अधिक भाविकांना यात्रेस परवानगी दिल्यामुळे या शिवलिंगावर परिणाम होत असल्याचा दावा पर्यावरणतज्ज्ञांनी केला आहे.
मे महिन्यामध्ये अमरनाथच्या गुहेमधील शिवलिंग सुमारे 7 फूट उंच होते. 29 जूनला पहिल्या पूजेच्या वेळी 5 फूटांपेक्षा जास्त उंचीचं शिवलिंग दिसत होतं. यात्रा सुरू झाल्यानंतर आठ दिवसांत जवळपास पूर्णपणे वितळले आहे. शिवलिंगाचा जवळपास 90 टक्क्यांहून अधिक भाग वितळला असून अगदी छोट्या आकाराचं बर्फाचं शिवलिंग आता भाविकांना दर्शन घेण्यासाठी उपलब्ध आहे.
उष्ण हवामान आणि उच्च तापमान हा शिवलिंग वितळण्यासाठी जबाबदार घटकांपैकी एकमेव घटक नाही. या वर्षी ग्लोबल वॉर्मिगमुळे साधारण उष्णता अधिक होती. अमरनाथमधील बर्फाचे शिवलिंग हे नैसर्गिक स्टॅलेग्माइट आहे. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गुहेच्या छतावरून पाण्याचे थेंब येऊन गोठतात आणि त्यापासून हे शिवलिंग तयार होते. उष्णता वाढली की हे गोठलेले पाण्याचे थेंब लवकर वितळतात. आताही तेच झालं आहे.
ऑगस्ट 1996 मध्ये अमरनाथ यात्रेच्या मार्गावर अतिवृष्टी आणि बर्फवृष्टीमुळे 250 ते 260 हून अधिक यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नेमलेल्या नितीन सेन गुप्ता समितीने यात्रेकरूंची संख्या 75 हजारांपर्यंत मर्यादित ठेवण्याची शिफारस केली होती. मात्र, प्रत्यक्षात ही मर्यादा पाळली गेली नाही. ही यात्रा 28 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यंदा या यात्रेदरम्यान 57 दिवस भाविकांना दर्शन घेता येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. आतापर्यंत 86 हजार भाविकांनी दर्शन घेतलं आहे. अजून 3 लाखांहून अधिक नोंदणीकृत भाविकांना दर्शन घ्यायचं आहे. भाविकांची वाढती संख्याही शिवलिंग लवकर वितळण्यासाठी कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे.
अमरनाथ यात्रा देवस्थान बोर्डाने मागील काही वर्षांत अमरनाथ गुहेतील तापमान नियंत्रणासाठी काही उपाययोजना केल्याचा दावा केला आहे. मात्र, वाढती गर्दी आणि उष्ण हवामानामुळे बर्फाचे शिवलिंग लवकर वितळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शिवलिंग वितळलं असलं तरी अमरनाथ देवस्थान बोर्डाने यात्रा सुरू ठेवली आहे. शिवलिंग वितळणे ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे बोर्डाकडून सांगितले जात आहे.