Pahalgam Terror Attack : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व स्तरांतून या हल्ल्याच्या निषेधार्थ आवाज उठवला जात असतानाच सोशल मीडियावर एक वर्ग असाही आहे ज्यानं सबंध मुस्लीम समुदायावर निशाणा साधत एक प्रकारची सामाजिक तेढ निर्माण करण्यात भर घातली आहे. या सर्व नेटकऱ्यांना आणि नकारात्मक विचारांना दुजोरा देणाऱ्यांना अनुराग कश्यपनं (Anurag Kashyap) त्याच्या शैलीत सुनावलं आहे.
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्यानं आपले विचार मांडत काही वास्तवदर्शी संदर्भांकडे साऱ्यांचच लक्ष वेधलं आहे. अनुरागनं शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये दिसणाऱ्या एका पोस्टमध्ये लिहिलंय,
'सहज एक पूर्वसूत्र...
टॅक्सीतून आलेले पर्यटक मुस्लीम समुदायाचेही होते...
ते ज्या हॉटेलमध्ये राहिले त्याचे मालक मुस्लीम होते
तिथं त्यांनी जे काही खाल्लं ते मुस्लीमांनीच बनवलेलं
ट्रेकिंगसाठी गाईडही मुस्लीम होता
जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पर्यटकांचा जीव वाचवू पाहणारे मुस्लीम होते
जीव वाचवण्यात पहिला प्राण गमावणारा मुस्लीम होता
पहिल्यांदा घटनास्थळी मदत पोहोचवणारे मुस्लीम होते
खच्चर मालक, एटीवी चालक मुस्लीम होते
प्रथमोपचार आणि बचावकार्य मुस्लीमांनीच केलं
रुग्णवाहिका चालवणारे मुस्लीम होते
रुग्णालयांमध्ये जखमींवर मुस्लीम डॉक्टर आणि परिचारिकांनी उपचार केले
पर्यटकांना श्रीनगरला नेऊन सोडणारे टॅक्सी चालक मुस्लीम होते.....
आणि सोशल मीडियावर सगळीकडे.... ''सर्व मुस्लीम दहशतवादी आहेत''
- आनंद पटवर्धन'
अनुरागनं केलेल्या या पोस्टवर अनेकांच्या नजरा खिळल्या आणि त्याचीच चर्चा नव्यानं सुरू झाली. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी व्यक्त झाले खरे, पण काही पोस्टनी मात्र अनेकांचच मन विचलित केलं. अशा या संवेदनशील समयी सामाजिक तेढ वाढेल असं कोणतंही वक्तव्य किंवा पोस्ट न करण्याचच आवाहन सध्या बरीच मंडळी करताना दिसत आहेत.