)
Army Chief General Upendra Dwivedi warned Pakistan: भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला जाहीरपणे इशारा दिला आहे. जर जगाच्या नकाशावर आपलं स्थान टिकवून ठेवायचं असेल तर शेजारी देशाने आपल्या भूमीवर दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानला ठणकालं आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील अनुपगड येथे सैनिकांशी संवाद साधताना लष्करप्रमुखांनी (CoAS) भविष्यातील संघर्षांमध्ये भारताचा दृष्टिकोन ऑपरेशन सिंदूरच्या तुलनेत खूपच आक्रमक असेल असं स्पष्ट केलं आहे.
"भारत, एक देश म्हणून, यावेळी पूर्णपणे तयार आहे. आणि यावेळी, ऑपरेशन सिंदूर 1.0 दरम्यान दाखवलेला संयम दाखवणार नाही. यावेळी आपण एक पाऊल पुढे टाकू आणि अशा पद्धतीने कृती करू ज्यामुळे पाकिस्तानला विचार करायला भाग पाडेल की त्याला जगाच्या नकाशावर राहायचं आहे की नाही," असं जनरल द्विवेदी यांनी आपल्या संबोधनात म्हटलं आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानमध्ये दहशतवादी लपलेल्या ठिकाणांचे पुरावे आधीच सादर केले होते, ज्यामुळे इस्लामाबादला त्यांच्या कारवाया लपवता आल्या नाहीत असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी अधोरेखित केलं की 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण जग भारताच्या पाठीशी उभं राहिलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 23 जणांचा मृत्यू झाला होता.
लष्करप्रमुखांच्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील नऊ ठिकाणांवर हल्ला केला, त्यापैकी सात ठिकाणे लष्कराने आणि दोन हवाई दलाने उद्ध्वस्त केली. “आम्ही टार्गेट ओळखले होते कारण आम्हाला फक्त दहशतवाद्यांना नुकसान पोहोचवायचे होते. आम्ही त्यांच्या तळांवर हल्ला करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. जोपर्यंत त्यांचा देश दहशतवाद्यांना पाठिंबा देत नाही तोपर्यंत आम्हाला सामान्य पाकिस्तानी नागरिकांविरुद्ध कोणतीही तक्रार नाही. दहशतवाद्यांना पाठिंबा दिला जात होता, त्यामुळे त्या दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आला,” असं त्यांनी स्पष्ट केले.
जनरल द्विवेदी यांनी यावेळी आंतरराष्ट्रीय सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांचं कौतुक केलं. भारताच्या सुरक्षा प्रयत्नांसाठी हे फार महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं. "आम्ही सीमावर्ती भागातील लोकांना सामान्य नागरिक म्हणून नाही तर सैनिक म्हणून मानतो. याचा अर्थ ते युद्धात आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे आहेत. हे महत्त्वाचे आहे कारण येणारा संघर्ष हा केवळ लष्कराचा नाही तर देशाचा संघर्ष आहे," असं ते म्हणाले.
त्यांनी सैनिकांना आठवण करून दिली की 1965 आणि 1971 च्या युद्धांदरम्यान, नागरिक सैन्यासोबत एकजुटीने उभे राहिले आणि ते पुन्हा असेच करतील असा विश्वास व्यक्त केला. "आम्हाला असं वाटते की त्यांनी येणाऱ्या काळातही आमच्यात सामील व्हावे. मी त्यांचे आभार मानू इच्छितो. त्यांचा उत्साह आमच्या सैनिकांचे मनोबल वाढवतो," असं ते पुढे म्हणाले.
लष्करप्रमुखांनी सैनिकांना कारवाईसाठी सज्ज राहण्याचे आवाहन करत शेवटी म्हटलं की, "आता पूर्णपणे तयार राहा, देवाची इच्छा असेल तर संधी लवकरच येईल".
FAQ
1) जनरल उपेंद्र द्विवेदी कोण आहेत?
जनरल उपेंद्र द्विवेदी हे भारताचे वर्तमान सेनाध्यक्ष आहेत, ज्यांची नियुक्ती जून २०२४ मध्ये झाली. ते जम्मू-काश्मीर लाइट इन्फंट्रीच्या अधिकाऱ्यांसह ४० वर्षांहून अधिक अनुभवाचे आहेत. त्यांच्याकडे नॉर्दर्न कमांड आणि पूर्वेकडील कमांडचे नेतृत्व केले आहे.
2) जनरल द्विवेदी यांच्या अलीकडील विधानाचा मुख्य मुद्दा काय?
त्यांनी पाकिस्तानला सांगितले की, राज्य-प्रायोजित दहशतवाद थांबवला नाही तर भारत "ऑपरेशन सिंदूर २.०" मध्ये मागील प्रमाणे संयम दाखवणार नाही. मुख्य उद्धरण: "नकाशावरून पुसून टाकू, संयम दाखवणार नाही." पाकिस्तानला "भूगोल किंवा इतिहास" यापैकी एक निवडण्याचा इशारा दिला.
3) पाकिस्तानला काय इशारा देण्यात आला?
पाकिस्तानला "भौगोलिक अस्तित्व टिकवायचे असेल तर दहशतवाद थांबवा" असे सांगितले. जर नवीन शत्रुत्व केले तर "भूगोल किंवा इतिहास" निवडावा लागेल, म्हणजे नकाशावरून पुसले जाईल. सेनाध्यक्ष म्हणाले, "दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील."