)
Bihar Election 2025 Date Announcement: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बिहार निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय दृष्ट्या ही निवडणूक केवळ बिहारपुरती मर्यादित नसून या निवडणुकीच्या निकालाचे परिणाम केंद्रीय राजकारणावर होईल असं भाकित अनेक राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळेच बिहार निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत नेमके किती लोक मतदान करणार? आघाड्या आणि युती यांची समिकरणं कशी आहेत? नेमकी इथली राजकीय स्थिती कशी आहे जाणून घेऊयात...
बिहार विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ 22 नोव्हेंबर 2025 रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे राज्यात नोव्हेंबरपर्यंत निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. मागील विधानसभा निवडणूक (2020) कोरोनाच्या संकटामुळे 28 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांत घेण्यात आली होती. भारतामध्ये कोरोना महामारीच्या काळात ही पहिलीच मोठी निवडणूक होती आणि यासाठी अनेक नियम आणि मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या होत्या.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असल्याचे दिसत आहे. विविध राजकीय पक्षांमध्ये वाटाघाटींवर खल सुरू आहे, तर भारतीय निवडणूक आयोगाने एसआयआरची (सखोल मतदार पडताळणी) आकडेवारीही जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार बिहारमध्ये आता 7.42 कोटी मतदार आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात लगेच आचारसंहिताही लागू होईल.
बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला 122 जागांची आवश्यकता आहे.
बिहारमध्ये सध्या जेडीयू, भाजप आणि त्यांच्या घटक पक्षांचं एनडीए सरकार सत्तेवर आहे. तर आरजेडीचे तेजस्वी यादव हे बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत.
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडी तयार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये नितीश कुमार यांच्याकडे महत्त्वाचे नेते म्हणून पाहिलं जात होतं. पण जानेवारी 2024 मध्ये ते पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी झाले आणि राष्ट्रीय जनता दलापासून (आरजेडी) त्यांनी फारकत घेतली. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयू आणि आरजेडी एकत्र लढले आणि बहुमत मिळवून त्यांनी सरकारही स्थापन केलं. परंतु, 2017 मध्ये ही आघाडी तुटली.
बिहार विधानसभेत सध्या भाजपचे 80 आमदार, आरजेडीचे 77, जेडीयूचे 45 आणि काँग्रेसचे 19 आमदार आहेत.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (मार्क्ससिस्ट-लेनिनिस्ट) (लिबरेशन) 11, हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे (सेक्युलर) 4, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (मार्क्सवादी) 2, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे 2, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीनचे 1 आणि 2 अपक्ष आमदार आहेत.
राज्यात यावेळीही प्रमुख लढत ही एनडीए विरुद्ध महाआघाडी यांच्यातच होईल असं बोललं जात आहे. एनडीएमध्ये जेडीयू, भाजप, एलजेपी (आर), जीतनराम मांझी यांचा हम (सेक्यूलर) आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चासारख्या पक्षांचा समावेश आहे. तर महाआघाडीत आरजेडी, काँग्रेस, सीपीआय, सीपीआय (माले), विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी), जेएमएम आणि राष्ट्रीय एलजेपीचा समावेश आहे. असदुद्दीन ओवैसींचा पक्ष एआयएमआयएम या दोन्ही आघाडीचा भाग नाही. 2020 च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने पाच जागा जिंकल्या होत्या, पण नंतर त्यांच्या चार आमदारांनी आरजेडीमध्ये प्रवेश केला होता.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांआधी निवडणूक आयोगानं एसआयआर सुरू केलं. याच्या टायमिंगवरून विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले, तर निवडणूक आयोगाने ही फक्त मतदार यादी दुरुस्त करण्याची प्रक्रिया असल्याचं म्हटलं.