)
Air India Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या AI-171 विमान अपघातात 260 जणांचा मृत्यू झाल्यानंतर चार महिन्यांनी वैमानिकाच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिवंगत कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या वडिलांनी दुर्घटनेची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. 88 वर्षीय पुष्कराज सभरवाल हे या प्रकरणातील पहिले याचिकाकर्ते आहेत, तर फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स हे दुसरे याचिकाकर्ते आहेत. दुर्घटनेची प्राथमिक चौकशी "खूपच सदोष" आहे असा याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद आहे. तपास पथक प्रामुख्याने वैमानिकांवर लक्ष केंद्रित करत आहे, जे आता स्वतःचा बचाव करू शकत नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे. मानवी चुकीमुळे विमान दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचललं आहे.
याचिकेत सांगण्यात आलं आहे की, "तपासाचा सध्याचा दृष्टिकोन या दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या इतर अधिक संभाव्य तांत्रिक आणि प्रक्रियात्मक घटकांची पुरेशी तपासणी करण्यात अपयशी ठरला आहे". तटस्थ न्यायायलीन चौकशीची गरज असल्याचं याचिकेत सांगण्यात आलं आहे. याचिकाकर्त्यांनी यावर भर दिला आहे की निवडक खुलासे करत मोजकं मार्गदर्शन केलं जात असून मूळ कारण शोधण्यात अडथळा निर्माण होत आहे. जे कर्मचारी स्वतःचा बचाव करू शकत नाहीत त्यांचा यात उल्लेख आहे.
याचिका पाच सदस्यांच्या तपास पथकाच्या निर्मितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. नैसर्गिक न्यायाच्या मुलभूत तत्वाचं उल्लंघन केलं जात आहे ज्यामध्ये व्यक्तीला स्वतःच्या प्रकरणात न्यायाधीश करु नये असं सांगण्यात आलं आहे असं याचिकेत म्हटलं आहे. "टीममध्ये डीजीसीए, राज्य विमान वाहतूक प्राधिकरणांचे अधिकारी आहेत ज्यांच्या कार्यपद्धती, देखरेख आणि संभाव्य त्रुटी थेट तपासात गुंतलेल्या आहेत. शिवाय, अधिकाऱ्यांना एएआयबीच्या महासंचालकांच्या नियंत्रणाखाली ठेवलं जाते, ज्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते जिथे नागरी विमान वाहतूक नियंत्रित करण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी जबाबदार असलेल्या संस्था स्वतःची प्रभावीपणे चौकशी करत आहेत," असं म्हटलं आहे.
केवळ न्यायालयीन देखरेखीखाली, नियामक अधिकाऱ्यांपासून स्वतंत्र, तज्ञच या दुर्घटनेच्या खऱ्या कारणांचा सखोल, पारदर्शक आणि विश्वासार्ह तपास करु शकतात असं त्यांनी म्हटलं आहे. या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील आणि विमान वाहतूक क्षेत्रातील स्वतंत्र तज्ज्ञांचा समावेश असलेल्या न्यायालयीन देखरेखीखालील समितीकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे एअर इंडियाचे विमान 171 12 जून रोजी दुपारी उड्डाणानंतर काही सेकंदातच कोसळलं. सर्व 12 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवाशांपैकी 229 प्रवाशांचा मृत्यू झाला. विमान अहमदाबादमधील एका मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले, ज्यामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला. या अपघातातून केवळ एकच प्रवासी चमत्कारिकरित्या बचावला.