Pahalgam Terrorist Attack: 'कोणताही दहशतवादी मारला गेला तर...'; देशातील 550000 मशि‍दींसाठी फतवा जारी

Fatwa On Pahalgam Terrorist Attack: भारतामध्ये असलेल्या साडेपाच लाग मशिदींसाठी हा फतवा जारी करण्यात आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 24, 2025, 03:07 PM IST
Pahalgam Terrorist Attack: 'कोणताही दहशतवादी मारला गेला तर...'; देशातील 550000 मशि‍दींसाठी फतवा जारी
इमाम डॉ. उमर अहमद इलियासी यांनी जारी केला फतवा

Fatwa On Pahalgam Terrorist Attack: काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध केला जात आहे. या हल्ल्यामध्ये 27 जणांनी आपले प्राण गमावल्याने देशभरातून या हल्ल्यासंदर्भात हळहळ व्यक्त केली जात आहे. सरकारी स्तरावर धोरणात्मक निर्णय घेतले जात असतानाच देशभरातील वेगवेगळ्या संघटना, संस्थांनी समोर येत या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. निषेध नोंदवताना मोर्चे, आंदोलने केली जात आहेत. भारतातील अनेक ठिकाणी मुस्लीम बांधवांनीही रस्त्यावर उतरुन या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. अनेक ठिकाणी उद्या शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. असं असतानाच आता मुख्य इमाम डॉ. उमर अहमद इलियासी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत फतवा जारी केला आहे.

कोणताही दहशतवादी मारला गेला तर...

मुख्य इमाम डॉ. उमर अहमद इलियासी यांनी जारी केलेल्या फतव्यामध्ये उद्याच्या शुक्रवारच्या प्रार्थनेत सर्व शहीदांना श्रद्धांजली वाहण्यास सांगण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे या फतव्यामध्ये पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांसंदर्भातही निर्देश देण्यात आले आहेत. "जर कोणताही दहशतवादी मारला गेला तर कोणताही मौलवी त्याच्यासाठी प्रार्थना करणार नाही," असंही मुख्य मौलवींनी फतव्यामध्ये सांगितलं आहे. तसेच, "मारलेल्या दहशतवाद्यांना भारतीय भूमीवर दफन केले जाणार नाही," असंही फतव्यामध्ये म्हटलं आहे. या शिवाय या फतव्यामध्ये, "दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, म्हणून देशभरातील साडेपाच लाख मशिदींना फतवा जारी करण्यात आला आहे," असं म्हटलं आहे. 

आम्ही सरकारच्या पाठीशी

या फतव्याच्या शेवटी मुख्य इमाम डॉ. उमर अहमद इलियासी यांनी, "प्रत्येक मुस्लिम पंतप्रधान मोदींसोबत उभा आहे, सरकारने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचे आम्ही स्वागत करतो," असंही म्हटलं आहे. 

दूतावासाबाहेर निदर्शने

नवी दिल्लीमधील भाजपाच्या अल्पसंख्याक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी दूतावासाबाहेर निदर्शने केली आहेत. पाकिस्तान मुर्दा बादाच्या घोषणा यावेळेस कार्यकर्त्यांनी दिल्या. काही मुस्लिम कार्यकर्तेही दूतावासाबाहेर पाकिस्तानचा निषेध करत आहेत. सरकारने पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला योग्य उत्तर द्यावे, अशी मागणी आंदोलन करणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी केली आहे.

व्यापारी सरकारच्या पाठीशी

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतलेल्या पाकिस्तानसंदर्भातील कठोर धोरणामत्मक निर्णयांना 'कॅट' म्हणजेच 'कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स' या व्यापारी संघटनेनं पाठिंबा दिला आहे. 'कॅट'ने जाहीर केले आहे की आता भारतीय व्यापारी पाकिस्तानसोबत कोणताही व्यवसाय करणार नाहीत. 25-26 एप्रिल रोजी भुवनेश्वर येथे होणाऱ्या 'कॅट'च्या बैठकीत हा निर्णय औपचारिकपणे घेतला जाईल. व्यापाऱ्यांनी दहशतवादाविरुद्ध एकजूट दाखवली आहे आणि पाकिस्तानशी सर्व प्रकारचे व्यापारी संबंध संपवण्याची मागणी केली आहे आणि देशाच्या सुरक्षेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.