'वर्ल्ड वॉर 3' सुरु असतानाच भारताने कॅनडा, ऑस्ट्रेलियाला घेतलं सोबत, मोठी घोषणा; अमेरिका-चीनला दणका

India New Trilateral Partnership: भारत, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही देशांनी एकत्र येण्याचा निर्णय घेत एका महत्त्वाच्या युतीच्या माध्यमातून विकास साधण्याचा निर्धार केला आहे. हे धोरण नेमकं काय आहे पाहूयात सविस्तरपणे...

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 3, 2026, 07:21 AM IST
'वर्ल्ड वॉर 3' सुरु असतानाच भारताने कॅनडा, ऑस्ट्रेलियाला घेतलं सोबत, मोठी घोषणा; अमेरिका-चीनला दणका
तिन्ही देशांची मोठी घोषणा (प्रातिनिधिक फोटो)

India New Trilateral Partnership: एकीकडे आखाती देशांमध्ये युद्ध सुरु असतानाच अमेरिकेने ट्रेड वॉर आणि टॅरिफच्या माध्यमातून आपल्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. तर दुसरीकडे चीनने ग्रीन टेक्नोलॉजी आणि मिनरल्सच्या बाजारपेठेवर एकहाती वर्चस्व मिळवलं आहे. चीन आणि अमेरिकेमध्ये ही वर्चस्वाची लढाई सुरु असतानाच जगातील अनेक देश सुरक्षित मार्गाच्या शोधात आहेत. हाच मार्ग दाखवण्याचा प्रयत्न आता जगातील तीन मोठ्या देशांनी सुरु केला आहे. चीन आणि अमेरिकेवर वेगवेगळ्या गोष्टींसाठी अवलंबून राहण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही देशांच्या संयुक्त प्रयत्नांना एसीआयटीआय म्हणजेच 'ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंडिया टेक्नोलॉजी अँड एनोव्हेशन ट्रँगल' असं नाव देण्यात आलं आहे. ही केवळ तीन देशांची युक्तीनसून यामुळे जगातील ग्रीन सप्लाय श्रेत्रामध्ये अमूलाग्र बदल घडणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source

ही युती करण्याचं खरं कारण काय?

क्लीन एनर्जी, इलेक्ट्रिक वाहने, सोलार पॅनल्स, पवनचक्क्या म्हणजे विकास असं सध्याच्या जगाचं समीकरण झालं आहे. या सर्वांसाठी लिथियम, कोबाल्ट, ग्रॅफाइड आणि दुर्मिळ खनिजांची आवश्यकता असते. या खनिजांच्या उत्खननावर आणि रिफाइन करण्यावर चीनचं नियंत्रण आहे. ग्रीन हायड्रोजन पुरवणाऱ्या इलेक्ट्रोलाइजर पुरवण्यावरही चीनचं नियंत्रण आहे. दुसरीकडे अमेरिकेने स्वीकारलेल्या नव्या टेरिफ विषयक भूमिकांमुळे जगभरातील देशांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात अशाप्रकारे संपूर्ण जगाने एकाच देशावर अवलंबून राहणं फार धोकादायक आहे. अशाप्रकारे एकाच देशावर अवलंबून राहवं लागू नये याच हेतूने भारत, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाने एसीआयटीआयची स्थापना केली आहे.

तीन गोष्टींवर लक्ष

ही युती तीन देशांच्या विविध शक्तींना एकत्रित करण्याचं माध्यम ठरणार आहे. या माध्यमातून एक शक्तिशाली पुरवठा साखळी तयार केली जाईल.  स्वच्छ ऊर्जा, महत्त्वपूर्ण खनिजे आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता या तीन गोष्टी या भागीदारीच्या केंद्रस्थानी असतील. 

तिन्ही देशांची ताकद काय?

ऑस्ट्रेलियाची ताकद: ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वात मोठा लिथियम उत्पादक देश आहे. लिथियम निर्मितीत ऑस्ट्रेलिया आघाडीवर आहे. सर्व प्रकारच्या बॅटरी बनवण्यासाठी वापरला जाणारा लिथियम हा सर्वात महत्त्वाचा धातू आहे.

कॅनडाची ताकद: कॅनडामध्ये महत्त्वपूर्ण खनिजांचे प्रचंड साठे आहेत. हे साठे हरित तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण साधन ठरु शकतो. त्यामुळे यासंदर्भात धोरणं अधिक सुनिश्चित होण्याची गरज आहे.

भारताची ताकद: भारत ही जगातील सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. भारताने 2030 पर्यंत 500 गिगावॅट अक्षय ऊर्जा निर्मितीचे मोठे लक्ष्य समोर ठेवले आहे. याचा अर्थ भारतात या नवीन तंत्रज्ञानाची सर्वाधिक मागणी आहे.

अशा परिस्थितीमध्ये ऑस्ट्रेलियातील कच्चा माल, कॅनडाचे तंत्रज्ञान आणि भांडवल तर भारताचा विशाल बाजार आणि उत्पादनाची क्षमता एकत्र येतील, तेव्हा हे तिन्ही देश एकत्र येऊन चीनच्या मक्तेदारीला थेट आव्हान देऊ शकतील.

पर्यावरणाचं हीत महत्त्वाचं

बऱ्याचदा, असे मोठे देश केवळ पैसे कमविण्यासाठीच एकत्र येतात असा समज आहे. मात्र परंतु एसीआयटीआयचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे. या तिन्ही देशांच्या युतीसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे केवळ स्मार्टफोन बनवण्यावर किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बुडबुड्यावर पैसे उडवणं या देशांना परडवणारं नाही. त्यामुळे ते या अशा गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणार नाहीत याची त्यांना वारंवार खातरजमा करुन घ्यावी लागणार आहे. चांगल्या गोष्टींसाठी तंत्रज्ञान विकसित करण्याचं या तिन्ही देशांचं ध्येय आहे. पर्यावरणाला फारशी हानी न पोहोचवता खनिजांचे उत्खनन कसे करायचे याचा शोध घेण्यासाठी तिन्ही देश एकत्र काम करतील, असं सांगण्यात आलं आहे. जुन्या बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक कचऱ्यापासून लिथियम, कोबाल्ट आणि तांबे कसे परत मिळवायचे याचाही हे तिन्ही देश एकत्रितपणे शोध घेतील.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More