India Pakistan tensions: 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचे प्राण गेले. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक दशकांपासून सुरू असलेला 1960 चा सिंधू पाणी करार महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला. भारताकडून हा करार स्थगित करण्यात आला.पहलगाम हल्ल्याबद्दल भारतात संतापाचे वातावरण आहे. पाकिस्तानला कोंडीत पकडण्यासाठी सरकारने अनेक कठोर पावले उचलली आहेत.
पहलगामच्या बैसरन मैदानात घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. ज्यात 2 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. हा हल्ला पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तैयबा' (एलईटी) चा सहयोगी असलेल्या 'द रेझिस्टन्स फ्रंट' (टीआरएफ) ने केल्याचे तपासात समोर आले आहे.
हल्ल्यानंतर भारत सरकारने आणखी एक कठोर पाऊल उचलले आणि सिंधू पाणी करार स्थगित केला. यासोबतच इतर अनेक कठोर निर्णय घेण्यात आले. ज्याचा थेट परिणाम पाकिस्तानवर होणार आहे. भारताच्या या कठोर निर्णयांनंतर पाकिस्तानने 1972 चा सिमला करारही स्थगित करण्याची घोषणा केली. या घटनांमुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
भारताने सिंधू पाणी करार रद्द करताच पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर याबद्दल बरीच चर्चा झाली. पाकिस्तानी नेटिझन्सनी यावर काही मनोरंजक आणि टीकात्मक रिअॅक्शन दिल्या. भारताने पाकिस्तानला कोणत्याही प्रकारे 'धमकी' दिल्या तरी पाकिस्तान आधीच पाणी टंचाई सारख्या अनेक संकटांना तोंड देतंय, असे पाकिस्तानी नेटिझन्स म्हणतायत.
एका पाकिस्तानी नेटिझन्सने पोस्टमध्ये लिहिले की, 'भारत आम्हाला धमकावण्यासाठी काहीही करू शकतो. आम्ही आधीच आमच्या सरकारच्या हातून त्रास सहन करत आहोत. तुम्ही पाणी थांबवाल का? ते असेही येत नाही. तुम्ही आम्हाला माराल का? आमचे सरकार आधीच आम्हाला मारतंय. तुम्ही लाहोर ताब्यात घ्याल का? तुम्ही अर्ध्या तासानंतर ते स्वतः परत आणाल. ही पोस्ट X (पूर्वीचे ट्विटर) वर 'Pvt_insaann' या हँडलवरून शेअर करण्यात आली आणि त्याला 126000 हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.