India Pakistan War : ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) थयथयाट करणाऱ्या पारिस्ताननं अखेर जे अपेक्षित होतं तेच केलं. भारतीय सीमाभागातून पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या या प्रयत्नांना भारतानं जमिनीवर आपटून प्रत्युत्तर दिलं. इथं पाकिस्तानकडून सतत कटकारस्थानं रचत भारतावर हल्ल्याचे प्रयत्न सुरु असतानाच तिथं सांबा सीमेनजीक दहशवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला.
सांबाच्या सीमेवरून जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नांत असतानाच बीएसएफनं त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या इशाऱ्यानुसार जवळपास 10 ते 12 दहशतवादी सांबा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतामध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नांत होते. याचदरम्यान बीएसएफच्या पेट्रोलिंग टीमनं क्षणात ही घुसखोरी ओळखत 7 दहशतवाद्यांचा खात्मा केला.
आयएसआयच्या इशाऱ्यानंतर भारतात घुसखोरी करत एक मोठा हल्ला घडवण्याच्या मनसुब्यानं हे दहशतवादी सीमा ओलांडू पाहत होते. त्यामुळं बीएसएफची ही कारवाई आताच्या क्षणाला अतिशय महत्त्वाची कारवाई ठरत आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं भारतावर हल्ले करण्याचे प्रयत्न केले खरे. मात्र हे सर्व हल्ले भारतानं उधळून लावले. एकिकडून भारतीय सैन्यदल, दुसरीकडून वायुसेना आणि तिथं सागरी मार्गानं भारतीय नौदलानं पाकिस्तानची कोंडी केली. देशाच्या सीमा भागांमध्ये बीएसेफनं मोहिम उचलून धरली आणि शत्रू राष्ट्राची घुसखोरी हाणून पाडली. एकंदरच शक्य त्या सर्व बाजूंनी भारतीय लष्कराच्या प्रत्यके तुकडीनं पाकिस्तानवर आघात केला.
भारतानं केलेल्या हल्ल्यांचं उत्तर देत पाकिस्ताननंही देशावर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यामुळं शत्रू राष्ट्रामध्ये हाहाकार माजला आणि पुन्हा एकदा पाकिस्तानचा खोटा आत्मविश्वास कोलमडला. भारतीय वायुदलानं पाकची लढाऊ विमानं हवेतल्या हवेतच नष्ट केली, तर पाकच्या 3 वैमानिकांना युद्धबंदी करण्यात आलं. यामध्ये JF-17 च्या पायलटचाही समावेश असल्याचं वृत्त समोर येत आहे.