)
दिल्लीमध्ये एका नवविवाहितेचा मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळताना दिसत आहे. नवविवाहितेची हत्या करण्यात आल्याचा संशय आधीपासून व्यक्त होत आहे. मध्य दिल्लीतील लोधी कॉलनी येथे 4 जुलै रोजी मृतदेह सापडला होता. दरम्यान मृतदेह पाहिल्यानंतर सर्वात आधी पोलिसांना फोन करणाऱ्या व्यक्तीने काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. 28 वर्षीय आकृती सुतारचा मृतदेह आढळल्यानंतर काही गोष्टींनी आपण अस्वस्थ झाल्याचं त्याने एनडीटीव्हीशी बोलताा सांगितलं आहे.
आपलं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर या व्यक्तीने सांगितलं की, "आकृतीचे पाय एका विचित्र प्रकारे वाकलेले होते. मी सुरक्षेच्या कारणास्तव माझा चेहरा किंवा ओळख जाहीर करु शकत नाही. तिथे रक्ताचा कोणताही डाग नव्हता".
मध्य दिल्लीतील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून आकृतीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. हुंड्यासाठी मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून तिचा पती अरस्तू सिक्का याला अटक करण्यात आली आहे. दोन वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह झाला होता.
"मी संध्याकाळी 7.26 वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. ही इमारत जवळपास रिकामीच आहे. दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर कोणीही राहत नाही," असं त्याने सांगितलं. "आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इथे फारसे कोणी राहत नाही हे तिला कसे समजले? ती नेमकी याच इमारतीत कशी आली?", असे प्रश्न त्याने उपस्थित केले आहेत. बहुतेक इमारतींचे गच्चीचे दरवाजेही कुलूप लावून बंद ठेवलेले असतात असंही त्याने नमूद केलं.
"इतक्या इमारतींपैकी याच इमारतीच्या गच्चीचा दरवाजा उघडा असल्याचं तिला कसं माहित? एकतर कोणीतरी आधीच या जागेची पाहणी केली होती किंवा कोणीतरी तिला येथे घेऊन आलं असावं," असा संशय त्याने व्यक्त केला आहे.
आकृतीचा धाकटा भाऊ अमय सुतार याने आरोप केला आहे की, "लग्नापूर्वी तिच्या पतीच्या कुटुंबीयांनी ती नोकरी करु शकते सांगत आपली संमती दर्शवली होती. मात्र, लग्नानंतर काही काळातच त्यांनी आपली भूमिका बदलली. नोकरी करण्यास परवानगी देण्याबाबत कधीच काही ठरलं नव्हतं असं ते सांगू लागले".
"माहेरून जास्त सामान न आणल्याबद्दल आपल्या बहिणीला वारंवार टोमणे मारले जात होते, असा आरोपही त्याने केला. "तिने पलंग, सोफा, कपाट, फ्रीज किंवा एअर-कंडिशनर यांसारख्या मूलभूत वस्तूही आणल्या नाहीत, असं ते म्हणायचे," असा आरोप त्याने केला आहे. अरास्तूच्या कुटुंबीयांनी 10 ते 20 लाखांची अप्रत्यक्ष मागणी केली होती असाही त्याचा दावा आहे.
सासरी मिळणारे टोमणे थांबवण्यासाठी आपली बहीण पुन्हा नोकरीवर रुजू व्हायचा प्रयत्न करत होती असं वाटत आहे. परिस्थिती कालांतराने सुधारेल या आशेने तिने आपल्या मृत्यूच्या आदल्या दिवसापर्यंत होणाऱ्या छळाची बरीचशी बाब लपवून ठेवली होती असंही त्याने सांगितलं आहे.