एनडीएच्या वादळात झाकोळले 'तेज'स्वी

महागठबंधनाच्या ‘मुस्लिम-अनुकूल’ प्रतिमेला भाजपनं अत्यंत प्रभावीपणे उचलून धरले.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 14, 2025, 10:47 PM IST
एनडीएच्या वादळात झाकोळले 'तेज'स्वी

ब्युरोरिपोर्ट, झी 24 तास, मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात तेजस्वी यादव यांच्याकडे आश्वासक आणि भविष्याचा चेहरा म्हणून पाहिलं जात होतं. निवडणुकांच्या प्रचारात तेजस्वी यादव यांचा झंझावात पाहायला मिळाला. तरुणाईनंही तेजस्वी यादव यांच्या सभांना प्रचंड गर्दी केली. तरुणाईचं हे वारं पाहून बिहारमध्ये सत्तांतर होणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र बिहार निकालानंतर एनडीएच्या वादळात तेजस्वी यादव आणि त्यांच्या राजदला मोठा फटका बसला.

Add Zee News as a Preferred Source

बिहार विधानसभा निवडणुकीत मतदारांनी तेजस्वी यादव आणि त्यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाला मोठा धक्का दिलाय.. तब्बल 144 जागा लढवणा-या राजदला अपेक्षित यश मिळालं नाही. निकालाच्या दिवशीही तेजस्वी यादवांकडून बिहारमध्ये सत्तांतराचा दावा करण्यात आला.. 

मात्र सुरुवाती कलांमध्ये जोरदार मुसंडी मारणा-या राजदची दुपार होता होता पार धूळदाण उडाली. या पराभवाची अनेक कारणं समोर येतायत... त्यापैकी एक प्रमुख कारण म्हणजे राजदकडून सुमारे 36% उमेदवारी यादव जातीतून दिली गेली. बिहारचं राजकारण जातीय समीकरणांवर आधारित असलं तरी हा निर्णय मतदारांना ‘यादव राज’ परत येत असल्याचा संदेश देऊन गेला. 

राजदनं 144 पैकी तब्बल 52 ठिकाणी यादव उमेदवारांना रिंगणात उतरवलं. म्हणजेच 14 टक्के लोकसंख्या असलेले यादव हे राजदचे प्रमुख मतदार असले तरी इतर मागास, अति-मागास आणि सवर्ण मतदार या जातीय समीकरणामुळे महागठबंधनापासून दूर गेले. राजद म्हणजे यादवराज हा मुद्दा मतदारांच्या मनात ठसवण्यात भाजप यशस्वी ठरला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तेजस्वी यादव रोजगार, महिलांसाठी योजना, पेन्शन, आणि दारूबंदीची समीक्षा अशा अनेक मोठ्या घोषणा केल्या. प्रत्येक घरात सरकारी नोकरी ही तेजस्वी यांची सर्वात मोठी घोषणा होती. मात्र याबाबत ते ब्लूप्रिंट देऊ शकले नाहीत.

या योजनांची अंमलबजावणी कशी होणार? पैसा कुठून येणार? याबाबत कोणतीही स्पष्टता दिली नसल्यानं मतदारांमध्ये अविश्वास वाढला. तेजस्वी यादव यांनी लालूंची सामाजिक न्यायाची विचारधारा स्वीकारली. मात्र ‘जंगलराज’ छबी टाळण्यासाठी त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. पोस्टर्समध्ये लालूंच्या फोटोंना छोटं स्थान दिल्यामुळे लालूसमर्थक नाराज झाले. जागावाटपात तणाव, जाहीरनाम्यात स्वतःलाच प्राधान्य, मित्रपक्षांना दूर ठेवल्याचा फटका तेजस्वी यांना बसला. जाहीरनाम्याला तेजस्वी प्रण नाव दिल्यानं मित्रपक्ष नाराज झाले. काँग्रेसनं गॅरेंटीवर भर दिला तर तेजस्वी यांच्याकडून नोक-यांचे वायदे करण्यात आले.

महागठबंधनाच्या ‘मुस्लिम-अनुकूल’ प्रतिमेला भाजपनं अत्यंत प्रभावीपणे उचलून धरले. मुस्लिम बहुल जागांवर राजदला फायदा झाला असला तरी उर्वरित राज्यात त्याचा तोटाच जास्त झाला. वक्फ विधेयकाविषयी तेजस्वी यांच्या भूमिकेमुळेही अनेक सामाजिक घटक नाराज झाले. भाजपनं लालू यादवांच्या संसदेतल्या वक्फ विधेयकविरोधी भाषणाचे क्लिप्स मोठ्या प्रमाणात व्हायरल करून त्याचा पूर्ण फायदा घेतला. त्यामुळे प्रचारसभांमध्ये तेजस्वी यादव यांच्या तरुणाची गर्दी होऊनही त्याचं मतांमध्ये रुपांतर झालं नसल्याचं पाहायला मिळालं. परिणामी बिहारमध्ये सत्तास्थापनेचं तेजस्वी यादव यांचं स्वप्न अधुरंच राहिलं आहे.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More