भारत-पाक युद्धामुळे Karachi Bakery अडचणीत! आंदोलनानंतर मालकाने सांगितलं 'कराची' नावामागील लॉजिक

India Pakistan War Karachi Bakery Protest: मुंबईमध्येही शाखा असलेल्या 'कराची बेकरी'समोर काही लोकांनी निदर्शनं केल्यानंतर या बेकरीच्या मालकांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: May 9, 2025, 07:34 AM IST
भारत-पाक युद्धामुळे Karachi Bakery अडचणीत! आंदोलनानंतर मालकाने सांगितलं 'कराची' नावामागील लॉजिक
बेकरीसमोर आंदोलनं झाल्यानंतर स्पष्टीकरण (फोटो - पीटीआय)

Karachi Bakery Protest And Name History: भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र याचा परिणाम हैदराबादमधील कराची बेकरीवर झाल्याचं दिसत आहे. या बेकरीसमोर काही लोकांनी आंदोलन करुन निषेध नोंदवला आहे. पाकिस्तानचा निषेध नोंदवत हैदराबादमधील या 60 वर्षांहून जुन्या बेकरीसमोर घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळेच या बेकरीच्या मालकांनी स्पष्टीकरण देण्याबरोबरच 'कराची बेकरी' या आपल्या दुकानावरील पाटीच्या बाजूला भारतीय झेंडा लावला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना बेकरीच्या मालकांनी नावासंदर्भातील खुलासा केला आहे. 

मालकांनी सांगितलं नावामागचं कारण

कराची बेकरीचे मालक राजेश रमनानी यांनी भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुकानासमोर आंदोलन झाल्यानंतर पीटीआयशी संवाद साधत आपली बाजू मांडली. "खरं तर आमचा हा 'कराची बेकरी' ब्रॅण्ड 1953 पासून हैदराबादमध्ये आहे. आमच्या आजोबांनीच ही बेकरी सुरु केली होती. या बेकरीला आता 72 वर्ष पूर्ण झाले आहेत. आम्ही सर्वजण भारतीय नागरिक आहोत. आमचं सगळं काही भारतातच आहे," असं राकेश रमनानी यांनी सांगितलं.

भारतभरामध्ये नानकटाईसाठी प्रसिद्ध असलेल्या या बेकरीचं नाव पाकिस्तानमधील कराची शहरावरुन का ठेवण्यात आलं आहे? याबद्दलचा खुलासाही बेकरी मालकांनी केला आहे. "या बेकरीचं नाव कराची असं यासाठी ठेवण्यात आलं होतं कारण 1947 मध्ये फाळणीनंतर आमचे आजोबा भारतात आले तेव्हा ते त्यांच्या मूळ ठिकाणाहून तेथील प्रेम आणि नाव घेऊन आले होते. तेव्हा ते पाकिस्तानमधील हैदराबादमध्ये होते नंतर इथे हैदराबादमध्ये स्थायिक झाले. ते केवळ कराची हे नाव घेऊन आले," असं राजेश रमनानी म्हणाले.

नाव बदलायला लागू नये म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती

राकेश यांचे बंधू हरिश रमनानी यांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, डीजीपी तसेच पोलीस कमिश्नर यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचं पीटीआयशी संवाद साधताना म्हटलं आहे. आम्हाला आमचं नाव बदलायला लागू नये म्हणून प्रशासनाकडून सहकार्य मिळावं अशी अपेक्षा असल्याचंही हरिश यांनी म्हटलं आहे. तसेच, "अनेकजण दुकानासमोर येऊन 'हे कराचीचे आहेत,' असं म्हणत आंदोलन करत आहेत. मात्र सत्य हे आहे की हा ब्रॅण्ड हैदराबादमधील भारतीय ब्रॅण्ड आहे. त्यामुळेच आम्ही दुकानावर भारताचे झेंडे लावले आहेत," असंही हरिश यांनी सांगितलं.

बेकरीचा इतिहास, मुंबईमध्येही शाखा

कराची बेकरीची मुख्य शाखा ही तेलंगणमधील हैदराबाद येथील मोअज्जम जही मार्केटमध्ये आहे. 1953 मध्ये श्री खानचंद रमनानी यांनी या बेकरीची सुरुवात केली होती. हैदराबादमधील ही सर्वात लोकप्रिय बेकरी आहे. येथील फ्रूट बिस्कीट, कुश बेरी केकला ग्राहकांकडून विशेष मागणी असते. हैदराबादबरोबरच बंगळुरु, चेन्नई, मुंबई आणि दिल्लीतही या बेकरीच्या शाखा आहेत.