Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये भ्याड दहशतवादी हल्ला घडवून आणल्यानंतर कट्टरतावादी आणि दहशकवादी संघटनांसह आता पाकिस्तानसुद्धा नव्यानं कावेबाजपणा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांनी दिली. भारतीय रेल्वेला हादरा देण्यासाठी आता दहशतवादी संघटना तयाकीरी करत असून, काश्मिरी पंडितांसह काश्मीरमध्ये काम करणाऱ्या अनिवासी नागरिकांना येत्या काळात निशाण्यावर घेतलं जाण्याचा धोका असल्यानं आता लष्कर आणि देशातील सर्वच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
जम्मू काश्मीर पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकानुसार पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय काश्मीरच्या खोऱ्यात कार्यरत असणारे पोलीस, सीआयडी आणि इतर राज्यांतील नागरिकांसह काश्मिरी पंडितांवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. आयएसआय आणि दहशतवादी मिळून उत्तर मध्य आणि दक्षिण काश्मीरमध्ये रेल्वेचीच यंत्रणा खिळखिळी करण्यासाठी कट रचत असल्याचं म्हटलं जात आहे.
भारतीय रेल्वेची काश्मीरपर्यंत येणारी यंत्रणा खिळखिळी करणं हे दहशतवाद्यांचं लक्ष्य असल्याचं सांगत या भागात अनेक अनिवासी कर्मचारी रेल्वेच्या सेवेत असून, त्यांना दहशतवादी निशाणा करु शकतात असं म्हटलं जात आहे. या भागास तात्पुरत्या स्वरुपात असणारे अनेक अनिवासी कर्मचारी आणि नागरिक फेरफटका मारण्यासाठी म्हणून स्थानिक बाजारपेठांमध्ये वावरत असतात. अशा स्थितीत कोणतीही अप्रिय घटना घडू शकते, ज्यामुळं पुढील काही दिवस सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं आणि सावधगिरी बाळगावी असा इशारा देण्यात आला आहे.
सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं तात्काळ स्वरुपात काही गोष्टींवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेकडून श्रीनगर आणि गांदरबल जिल्ह्यांमध्ये प्रामुख्यानं काश्मिरी पंडिर आणि पोलीस कर्मचाऱ्यांनाही निशाण्यावर घेण्याचा कट रचला जात आहे, त्यामुळं या भागात यंत्रणा सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे.