Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ज्याप्रमाणे महाराष्ट्र हादरला आहे, त्याचप्रमाणे कानपूरमधील एका तरुणाच्या मृत्यूनंतर प्रत्येकजण हळहळला. पतीच्या निधनानंतर कानपूरची एशान्या नेमकं व्यक्त कसं व्हावं याच विवंचनेत आहे. तिच्या डोळ्यादेखत पतीची हत्या होण्याचं दृश्य अद्यापही थरकाप उडवत आहे. तिथं दहशतवाद्यांनी जेव्हा हल्ला केला तेव्हा, रक्ताचे पाट वाहण्यापूर्वी त्यांनी पर्यटकांशी विचित्रसा संवाद साधला. शुभम द्विवेदीच्या पत्नीनं तिथं नेमकं काय घडलं, याची आपबिती सांगितली आणि ऐकणाऱ्य़ा प्रत्येकाचा थरकाप उडाला.
जे आणि जसं घडलं, ते तसंच सांगताना एशान्या म्हणाली...
'आम्ही पहलगामच्या वरच्या चढाईवर गेलो. तिथे आम्हाला घोड्यावर बसवून नेलं होतं. आम्ही नुकतंच वर पोहोचलो होतो, शुभमने मॅगी ऑर्डर केली होती आणि आम्ही ती खाणार होतो. बाबा वॉशरूममध्ये गेले होते, माझी बहीण थोडी दूर बसली होती.
तेवढ्यात मागून एक माणूस आला आणि गोळी बाजूला ठेवून विचारलं, की तू हिंदू आहेस की मुस्लीम, जर तू मुस्लिम आहेस तर प्रथम कलमा म्हण..., आम्हाला समजलंच नाही. शुभम हसला आणि म्हणाला काय झालं...? त्यावर त्यानं पुन्हा विचारलं की तो हिंदू आहे की मुस्लीम, यावर आम्ही त्याला सांगितलं की आम्ही हिंदू आहोत. हे बोलताच त्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. पहिला हल्ला त्याच्यावरच केला आणि त्यानंतर त्यांनी तिथे अनेकांना मारलं...', घटनास्थळावर नेमकं काय घडलं हे सांगताना, 'त्यांनी का मारलं?' या प्रश्नावर तिनं आक्रोश केला आणि अनेकांचच काळीज हेलावलं.
आपल्या माणसांवर हल्ला होत असताना आणि त्यांचा बळी जात असताना पाहूनही तिथं असणाऱ्या कोणालाही मदत मिळू शकली नाही. अतिशय हतबलतेनं पहलगाममधील घटनास्थळी प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रियजनांच्य़ा रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या मृतदेहांकडे पाहताना आक्रोश करत होते, काहीजण शून्यात पाहावं तसं त्या मृतदेहांकडे एकटक पाहत होते. सध्या या भ्याड हल्ल्याचा देशभरातून निषेध करत भारत सरकारकडूनही हल्ल्याचं उत्तर देत कठोर कारवाई केली जाण्याच्या हेतून काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत.