Pahalgam Terror Attack: काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुळं संपूर्ण भारतात खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार 10 दहशतवाद्यांनी पहलगाम येथे आलेल्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट झाले आहे तर पंतप्रधान मोदी सौदी दौरा अर्धवट सोडून दिल्लीत दाखल झाले आहेत. गेल्या दहा वर्षांत (2015-2025) जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले. त्यामुळं मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली आहे.
1) 16 सप्टेंबर 2015
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी जम्मू-श्रीनगर राजमार्गावर BSFच्या पथकावर हल्ला केला होता. यातील 2 जवान शहीद झाले होते तर 11 जखमी झाले होते. एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती.
2) 18 सप्टेंबर 2016
जम्मूपासून 102 किमी अंतरावर उरी येथील लष्करी तळावर चार दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात 19 भारतीय जवान शहीद झाले. हा हल्ला लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे मानले जाते. यानंतर भारताने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केला.
3) 10 जुलै 2017: अमरनाथ यात्रा हल्ला
अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, ज्यात 7 भाविक ठार आणि 19 जखमी झाले. हिजबूल मुजाहिद्दीनशी संबंधित असल्याचा संशय आहे.
4) 14 फेब्रुवारी 2019: पुलवामा हल्ला
पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघातकी कार बाँब हल्ला झाला, ज्यात 40 जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. यानंतर भारताने बालाकोट येथे हवाई हल्ले केले.
5) 2021: श्रीनगरमध्ये हल्ले
ऑक्टोबर 2021 मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा हिंसाचार वाढवला. माखनसिंग बिंद्रू, एक प्रसिद्ध काश्मिरी पंडित व्यापारी, यांची श्रीनगरमध्ये हत्या करण्यात आली. याशिवाय अनेक नागरिक आणि अल्पसंख्याकांवर हल्ले झाले.
6) 9 जून 2024
रियासीमध्ये दहशतवाद्यांनी शिव खोरी मंदिरातून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवर हल्ला केला होता. त्यानंतर बस दरीत कोसळून 9 लोकांचा मृत्यू झाला आण 33 जण जखमी झाले होते.
7) 8 जुलै 2024
कठुआ येथे दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड आणि गोळीबार केला यात 5 सैनिक शहीद झाले होते
8) 16 जुलै 2024
डोडाच्या देसा जंगलात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये 4 सैनिक आणि 1 पोलीस कर्मचारी शहीद झाले. २०२० मध्ये सरकारने डोडाला दहशतवादमुक्त घोषित केले होते.
9) 20 ऑक्टोबर 2024
गंदरबलमधील एका बांधकाम स्थळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात स्थानिक नसलेल्या कामगारांना आणि एका स्थानिक डॉक्टरला लक्ष्य केले. एकूण 7 जणांचा मृत्यू झाला होता. जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीनंतर हा हल्ला झाला.
10) 2025: पहलगाम हल्ला (एप्रिल)
पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या हल्ल्याला "भ्याड" आणि "निंदनीय" म्हटले आहे.