Pahalgam Terror Attack : गेल्या दोन दिवसांपासून सगळीकडे कश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्याचीच चर्चा सुरु आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात लष्करी जवानांच्या वेगवेगळ्या टीम बनवून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. आता भारतीय सेनेनं या हल्ल्यातील एका दहशतवाद्याचं घर उडवून दिलं आहे. काश्मीरमधल्या त्रालमधील मोनाघन भागात लष्करचा दहशतवादी आसिफ शेखचे घर लष्करी कारवाईदरम्यान उद्ध्वस्त करण्यात आले आहे. तो पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी झाला होता. पाकिस्तानवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी भारतीयांकडून होत आहे. दरम्यान, या सगळ्यात राजस्थानमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी हिंदू महिला राधा भील या भावूक झाल्या आहेत. राधा या जैसलमेरच्या जवळ राहतात. त्या 27 वर्षांच्या असून त्यांच्याकडे पाकिस्तानी नागरिकत्व आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या 2 वर्षांच्या मुलापासून लांब जावं लागेल याची भीती वाटू लागली आहे.
खरंतर, त्यांना ही भीती वाटण्याचं कारण म्हणजे पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारचा पाकिस्तानी वीजा हा रद्द करण्याचा निर्णय. सरकारनं सगळ्या पाकिस्तानी नागरिकांना 27 एप्रिलपर्यंत त्यांच्या देशात परत जाण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, TOI च्या रिपोर्टनुसार, जैसलममेरमध्ये राधा एकमेव अशी व्यक्ती नाही. तर भारत सरकारनं घेतलेल्या या निर्णयानंतर 1200 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक हे शॉर्ट वीजावर राहत असून ते नाराज झाले आहेत. परदेशी प्रादेशिक नोंदणी अधिकारी नरपत सिंग म्हणाले की त्यांचे कार्यालय हे गृह मंत्रालयाच्या आदेशांची प्रतीक्षा करत आहे आणि दीर्घकालीन वीजा धारकांना सध्या काळजी करण्याची गरज नाही असे आश्वासन त्यांनी दिले. तर राधा या दीर्घकालीन वीजा धारक असून भारतात आहे.
राधा या त्यांचा नवरा राजू राम हे 30 वर्षांचे असून त्यांना 8 आणि 7 वर्षांच्या अशा दोन मुली आहेत. हे फेब्रुवारी 2023 मध्ये दीर्घकालीन वीजावर भारतात आले. दरम्यान, त्यावेळी त्यांच्या दोन वर्षांचा मुलगा घनश्यामला वीजा मिळाला नव्हता. तो त्याचे आजी-आजोबा यांच्यासोबत पाकिस्तानमध्येच राहिला. तर घनश्याम आणि त्याच्या आजी-आजोबांना शॉर्ट वीजावर भारतात यायला 2 वर्षांचा काळ लागला. तर तो आता 6 एप्रिल रोजी भारतात आला.
याविषयी बोलताना राधा म्हणाल्या की, माझ्या मुलाला माझ्या कुशीत घ्यायला मी दोन वर्ष प्रतीक्षा केली, पण पुन्हा एकदा मला त्याच्यापासून दूर व्हावं लागेल. दिलीप सिंग सोढा जे धार्मिक कारणांवरून पाकिस्तानमध्ये त्यांच्यासोबत जो छळ होत होता त्याला कंटाळून ते भारतात आले होते. ते म्हणाले की तुम्हाला हवं तर तुम्ही आम्हाला इथेच गोळी मारा. कमीत कमी आमच्या अस्थी या हरिद्वारमध्ये तर जातील.