नवी दिल्ली: पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांच्या नृशंस कृत्यांना योग्य ते प्रत्युत्तर देण्यात येईल. त्यांनाही लवकरच आमच्याप्रमाणेच यातना सहन कराव्या लागतील, असा इशारा भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिला. 


भारत सरकारचे याविषयीचे धोरण स्पष्ट आणि अचूक आहे. चर्चा आणि दहशतवाद एकाचवेळी शक्य नाही, हे आम्ही अगोदरच स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाकिस्तानला दहशतवादाला आळा घालावाच लागेल. सीमारेषेवर पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांच्या नृशंस कृत्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. त्यांना जशास तसे उत्तर देण्याची वेळ आता आली आहे. मात्र, हे करताना कुठेही नृशंसपणाला थारा नसेल. परंतु, आता त्यांनाही यातना जाणवल्या पाहिजेत, असे बिपीन रावत यांनी सांगितले.