RBI कडून या प्रसिद्ध बॅंकेवर मोठी कारवाई, ग्राहकांवर काय होणार परिणाम? आताच जाणून घ्या!

RBI Action: आरबीआयने देशातील एका प्रसिद्ध बॅंकेवर कारवाई केलीय. कोणती आहे ही बॅंक? का झालीय तिच्यावर कारवाई? जाणून घेऊया.

प्रविण दाभोळकर | Updated: Nov 16, 2025, 03:05 PM IST
RBI कडून या प्रसिद्ध बॅंकेवर मोठी कारवाई, ग्राहकांवर काय होणार परिणाम? आताच जाणून घ्या!
आरबीआय

RBI Action: आपले पैसे सुरक्षित राहण्यासाठी बॅंक हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. पण बॅंकेने नियम मोडल्यास त्यांच्यावर काय कारवाई होते. नियम मोडणाऱ्या बॅंकांवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय कारवाई करते. आरबीआयने अशाचे एका प्रसिद्ध बॅंकेवर कारवाई केलीय. कोणती आहे ही बॅंक? का झालीय तिच्यावर कारवाई? याचा बॅंकेती ग्राहकांवर कसा परिणाम होणार? सविस्तर जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

नोव्हेंबर 2024 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तामिळनाडू मर्कंटाइल बँक लिमिटेडवर म्हणजेच टीएमबीवर 39.60 लाख रुपयांचा दंड लावला. ही बँक देशातील सर्वात जुन्या खाजगी बँकांपैकी एक असून, 1921 मध्ये स्थापन झाली. तिचे मुख्यालय तामिळनाडूच्या थुथुकुडी शहरात आहे आणि देशभरात 500 पेक्षा जास्त शाखा कार्यरत आहेत. 13 नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेल्या प्रेस रिलीजमध्ये ही माहिती देण्यात आली. ही कारवाई बँकेच्या नियमभंगामुळे झाली, ज्यामुळे ग्राहकांमध्ये काही काळजी निर्माण झालीय.

तपासणीत काय उघड झालं?

31 मार्च 2024 पर्यंतच्या बँकेच्या आर्थिक स्थितीची आरबीआयने बारकाईने तपासणी केली. यात बँकेने काही महत्त्वाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही, असे आढळले. त्यानंतर बँकेला कारणे दाखवा नोटीस पाठवली गेली. बँकेच्या उत्तर आणि सुनावणीदरम्यानच्या सादरीकरणांचा अभ्यास केल्यानंतर आरोप खरे असल्याचे सिद्ध झाले. शेवटी मध्यवर्ती बँकेने हा दंड ठोठावला.

बॅंकेने कोणते नियम मोडले?

बँकेने मूलभूत बचत खातेधारकांना यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) वापरून पैसे पाठवल्याबद्दल अप्रत्यक्ष शुल्क लावले, जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. एवढेच नव्हे तर ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी म्हणजेच डीईएएफमध्ये वेळेत योग्य रक्कम जमा करण्यातही बॅंकेला अपयश आले. हे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स कायदा 2007 च्या कलम 10अ आणि बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 26अ चे थेट उल्लंघन आहे. अशा चुकांमुळे बँकिंग क्षेत्रातील पारदर्शकता आणि ग्राहक हितावर परिमाम होत असतो.

ग्राहकांवर काय परिणाम? 

आरबीआयने अधिसूचनेत स्पष्ट केले की, ही कारवाई फक्त बँकेच्या नियामक त्रुटींवर आधारित आहे. ग्राहकांच्या कोणत्याही करार, बचत खाती, कर्जे किंवा मुदत ठेवींवर याचा काहीही परिणाम होणार नाही. 'ग्राहक नेहमीप्रमाणे आपले व्यवहार सुरू ठेवू शकतात. बँकेच्या सेवांमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही', असे आरबीआयचे म्हणणे आहे. म्हणजेच खातेधारकांना काळजी करण्याची गरज नाही; सर्व काही पूर्वीप्रमाणेच चालेल, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. 

बँकांनी काय घ्यायचा धडा? 

ही घटना बँकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याची आठवण करून देते. टीएमबी सारख्या मोठ्या बँकेला दंड झाल्याने इतर बँकाही सतर्क होतील. ग्राहकांनी मात्र आपल्या खात्यांची नियमित तपासणी करावी आणि डिजिटल व्यवहार सुरक्षित ठेवावेत. आरबीआयच्या या पावलामुळे बँकिंग व्यवस्था अधिक मजबूत आणि विश्वासार्ह होईल. 

बँकेची पार्श्वभूमी काय?

टीएमबी ही तामिळनाडूतील प्रमुख खासगी बँक आहे, जी छोट्या व्यवसाय आणि वैयक्तिक ग्राहकांना प्राधान्य देते. ही कारवाई बँकेच्या एकूण आर्थिक आरोग्यावर परिणाम करणारी नाही, पण आरबीआयच्या कडक धोरणांचे संकेत देते. ग्राहकांनी आपल्या खात्यांची माहिती तपासावी आणि नियमितपणे अपडेट ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

FAQ

१. प्रश्न: आरबीआयने तामिळनाडू मर्कंटाइल बँकेला किती दंड ठोठावला आणि का?

उत्तर: आरबीआयने १३ नोव्हेंबरला बँकेला ३९.६० लाख रुपयांचा दंड लावला. कारण बँकेने मूलभूत बचत खातेधारकांना यूपीआय व्यवहारांवर अप्रत्यक्ष शुल्क आकारले आणि ठेवीदार शिक्षण निधीत वेळेत रक्कम जमा केली नाही, ज्यामुळे कायद्यांचे उल्लंघन झाले.

२. प्रश्न: हा दंड बँकेच्या ग्राहकांवर कसा परिणाम करेल?

उत्तर: ग्राहकांना काहीही काळजी करण्याची गरज नाही. ही कारवाई फक्त नियामक त्रुटींवर आहे. बचत खाती, कर्जे, मुदत ठेवी किंवा इतर सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही; सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

३. प्रश्न: बँकेने कोणते कायदे मोडले?

उत्तर: बँकेने पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स कायदा २००७ चे कलम १०अ आणि बँकिंग नियमन कायदा १९४९ चे कलम २६अ चे उल्लंघन केले. यात यूपीआय शुल्क आणि ठेवीदार निधी हस्तांतरित न करण्याचा समावेश आहे.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More