Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) पहलगाम इथं झालेला हल्ला कोणा पंथावर किंवा संप्रदायावर झाला नसून, हा संपूर्ण लढा धर्म आणि अधर्माचा असल्याची स्पष्ट प्रतिक्रिया सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
आपल्याकडे धर्म विचारून कधीच कोणावर हल्ला केला जात नाही, पण या कट्टरपंथियांनी पहलगाममध्ये जो उच्छाद मांजला, धर्म विचारून अनेकांचा बळी घेतला.... हिंदू असं कधीच करणार नाहीत. पण, संप्रदायाविषयी चुकीचे अर्थ काढणारे कट्टरतावादी मात्र असं करतील आणि म्हणून देश आणखी बलशाली झाला पाहिजे, असं ते म्हणाले. या घटनेनंतर आपण सारेच दु:खी आहोत. मात्र, आपल्या मनात संतापाची भावनाही आहे आणि ती असावी. कारण, असुरांचा अंत करण्यासाठी अष्टभुजांची ताकद असणं गरजेचं आहे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
निसर्गातील काही गोष्टी सुधारणं गरजेचं असतं. मात्र काही गोष्टी कधीच सुधारत नाहीत. कारण, त्यांनी शरीर, बुद्धी आणि मन धारण केलं आहे आणि आता त्याच परिवर्तनास वाव नाही असं म्हणताना भागवत यांनी रामायणातील एक उदाहरण दिलं. 'ज्याप्रमाणे रावण वेदशास्त्रसंपन्न असूनही त्यानं जे शरीर धारण केलं होतं त्यात बदलांना वाव नव्हता. म्हणजेच जोपर्यंत रावणाचा दुसरा जन्म येत नाही, हे शरीर त्यागत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये सुधारणेचा वाव नाही. म्हणजेच रावणाला सन्मार्गावर आणण्यासाठी श्रीरामानं त्याचा वध केला होता', असं ते म्हणाले.
सैन्य नको म्हणुन आपण गाफील राहिल्याचा 1962 ला धडा घेतला, त्यामुळं आता संरक्षणाच्या बाबतीत आपण अधिक चांगल्या स्तरावर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणूनच दुष्टांचा वध केला गेलाच पाहिजे असं म्हणताना पहलगाममधील या घटनेबाबत प्रचंड संताप तर आहे आणि अपेक्षाही आहेत. या अपेक्षा पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
द्वेष शत्रुता हा आपला स्वभाव नाही, तसा मार खाणे हा ही आपला स्वभाव नाही, असं म्हणताना शक्तिवान माणसाला अहिंसक असले पाहिजे. शक्तीहीनाला त्याची गरज नाही. शक्ती आहे ती अशा वेळी दिसली पाहिजे, असं ते ठणकावून म्हणाले.