सीमा हैदरलाही सोडावा लागणार भारत? पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानींना 48 तासांचा अल्टीमेटम!

Seema Haider latest news: सीमा हैदरची कहाणी यापूर्वी सोशल मीडियापासून ते वृत्तवाहिन्यांपर्यंत हेडलाईन बनली होती.

प्रविण दाभोळकर | Updated: Apr 24, 2025, 03:42 PM IST
सीमा हैदरलाही सोडावा लागणार भारत? पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानींना 48 तासांचा अल्टीमेटम!
सीमा हैदर

Seema Haider latest news: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध मोठे आणि कठोर निर्णय घेतलाय. सार्क व्हिसा सूट धोरणांतर्गत पाकिस्तानी नागरिकांना दिली जाणारी सुविधा बंद करण्यात आली आहे. या निर्णयानुसार आता पाकिस्तानी नागरिक या सवलती अंतर्गत भारतात प्रवास करू शकणार नाहीत. या सुविधेअंतर्गत भारतात आधीच उपस्थित असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना एका आठवड्याच्या आत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्वात सीमा हैदर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पाकिस्तानची सीमा हैदर मे 2023 मध्ये नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात आली होती. यानंतर सोशल मीडियावर लोकांनी तिला पाकिस्तानला पाठवण्याची मागणी केली आहे.

सीमा हैदरची कहाणी यापूर्वी सोशल मीडियापासून ते वृत्तवाहिन्यांपर्यंत हेडलाईन बनली होती. ऑनलाइन गेम PUBG द्वारे ग्रेटर नोएडा येथील रहिवासी सचिन मीनासोबत सीमाचे सूर जुळले. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. यानंतर सीमा तिच्या 4 मुलांसह भारतात आली. आता ती सचिनसोबत नोएडामध्ये राहतेय. अलीकडेच दोघांनाही एक मूलही झाले आहे.

सीमा हैदरवर सरकारच्या निर्णयाचा काय परिणाम?

सरकारच्या सध्याच्या निर्णयानंतर सीमा हैदरवरही त्याचा परिणाम होईल का? असा प्रश्न विचारला जातोय. पोलिस तज्ज्ञांच्या मते सीमावर थेट परिणाम होणार नाही. कारण सीमा व्हिसाद्वारे भारतात आली नव्हती तर बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून भारतात आली होती. तिच्याविरुद्धचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. जोपर्यंत न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत तिला देशाबाहेर काढता येणार नाही. कोतवाली पोलीस या प्रकरणाची चौकशी करतायत. तसेच केंद्र सरकारकडून यासंदर्भात कायदेशीर मतदेखील मागवण्यात आले आहे.

या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेनंतरच कोणताही निर्णय घेतला जाईल. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध तणावपूर्ण आहेत. भारत सरकारचा हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा आणि धोरणात्मक पाऊल मानला जात असल्याची प्रतिक्रिया पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.  

पहागाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर झाडल्या गोळ्या

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर 6 वर्षांनी पृथ्वीवरील स्वर्ग मानले जाणारे काश्मीर निष्पापांच्या रक्ताने माखले. पहलगामच्या 'मिनी स्वित्झर्लंड' बैसरन येथील दहशतवादी हल्ल्याने पुलवामाच्या जखमा ताज्या केल्या. ज्यामध्ये 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. हिरवळीसाठी प्रसिद्ध असलेल्या बैसरन खोऱ्यातील हिरवीगार शेते मंगळवारी दुपारी रक्ताने लाल झाली. सर्वत्र निष्पाप लोकांचे मृतदेह पडले होते आणि रडणारे कुटुंबीय तिथेच होते. या भयानक दृश्याने 14 एप्रिल 2019 रोजी पुलवामा हल्ल्याच्या जखमा ताज्या झाल्या. जिथे दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला होता. पहलगाममध्येही दहशतवाद्यांनी असेच काहीसे केले. जिथे त्यांनी प्रथम लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले आणि नंतर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये 26 लोक ठार झाले. दहशतवाद्यांच्या या भ्याड आणि अमानवी कृत्याने पर्यटकांनी नेहमीच गजबजलेल्या बैसरन खोऱ्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत काश्मीरमध्ये पर्यटकांवर इतका मोठा हल्ला झाला नव्हता. गेल्यावर्षी 18 मे च्या रात्री दहशतवाद्यांनी 2 ठिकाणी हल्ला केला होता. यामध्ये एक हल्ला पहलगामजवळ आणि दुसरा खुल्या पर्यटक छावणीत झाला होता.