भारताला धोका वाढला? तुर्कीची पाकिस्तानला रसद! ड्रोन आणि दारुगोळ्याने भरलेली 6 विमानं पाकिस्तानात?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तुर्कीच्या मदतीने पाकिस्तान भारताला टक्कर देणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Apr 29, 2025, 12:15 PM IST
भारताला धोका वाढला? तुर्कीची पाकिस्तानला रसद! ड्रोन आणि दारुगोळ्याने भरलेली 6 विमानं पाकिस्तानात?

India vs Pakistan war: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर आणि काश्मीरवरून भारत-पाकिस्तान संघर्ष सुरु असतानाच यामध्ये तुर्कीने उडी मारली आहे. तुर्की पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहिला असून तुर्कीने पाकिस्तानची बाजू घेतली आहे. भारत अनेकदा तुर्कीच्या मदतीला धावून गेला आहे. तुर्की आणि चीनने पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पाठविल्याची माहिती समोर येत आहे. चीन आणि तुर्कीच्या जिवावरच पाकिस्तान भारतासोबत युद्धाच्या तयारीत आहे. 

भारताने तुर्कीला कितीही मदत केली असली तरी देखील तुर्की हा पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला आहे. तुर्कीने भारताविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात लष्करी शस्त्रसामग्री पाठवली आहे. ज्यामध्ये ड्रोन आणि दारुगोळ्याने भरलेली 6 विमानं पाकिस्तानात दाखल झाली आहेत. तुर्कीच्या लष्कराचे एअर फोर्स सी 130 हे मालवाहू हर्क्युलिस विमान रविवारी कराची विमानतळावर दाखल झाले आहे. 

तुर्कीच्या मदतीने पाकिस्तान भारताला टक्कर देणार? 

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाच वातावरण आहे. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांकडून सीमारेषेवर सैन्य आणि युद्धसामग्रीची जमवाजमव करण्यात येत आहे. अशातच तुर्कीने पाकिस्तानला अत्याधुनिक युद्धसामुग्री पाठवल्याची माहिती सध्या समोर येत आहे. तुर्कीने सी-130 या विमानातून पाकिस्तानला युद्धासाठी दारुगोळा आणि ड्रोन पुरवल्याची माहिती आहे. परंतु, तुर्कीने या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे. 

आम्ही पाकिस्तानला कोणतीही मदत केलेली नाही. आमचे विमान हे पाकिस्तानमध्ये फक्त इंधन भरण्यासाठी उतरले होते. त्यानंतर आम्ही आमच्या ठरलेल्या मार्गानी प्रवास केला. त्यामुळे आम्ही पाकिस्तानला दारुगोळा पुरवल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं तुर्कीच्या संरक्षण खात्याकडून सांगण्यात येत आहे. 

पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनस्थळं बंद 

पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील अनेक पर्यटनस्थळं ही काही दिवसांसाठी बंद करण्यात यावी असे आदेश सरकारने दिले आहेत. सध्या काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात तिथे लष्कर देखील तैनात करण्यात आले आहे. त्या ठिकाणी असणारी हॉटेलं आणि रिसॉर्ट देखील बंद ठेवण्यात आली आहेत.