2026 संपण्यआधी रस्त्यांवर दिसेल चमत्कार, गाड्या आपापसात साधतील संवाद; भारत सरकारच्या V2V टेक्नॉलॉजीचा तुम्हाला कसा फायदा?

Vehicle Talk : नव्या व्ही टू व्ही टेक्नोलॉजीमुळे वाहने एकमेकांशी थेट बोलू शकतील.

प्रविण दाभोळकर | Updated: Jan 10, 2026, 09:25 PM IST
2026 संपण्यआधी रस्त्यांवर दिसेल चमत्कार, गाड्या आपापसात साधतील संवाद; भारत सरकारच्या V2V टेक्नॉलॉजीचा तुम्हाला कसा फायदा?
व्हेकल तंत्रज्ञान

Vehicle Talk : भारतातील कोट्यवधी वाहन चालकांसाठी आनंदाची अपडेट समोर येतेय. ट्रॅफीक आणि अपघात या वाहनचालकांच्या सर्वात मोठ्या समस्या आहेत. पण असं एक तंत्रज्ञान येऊ घातलंय, ज्यामुळे अशा अनेक समस्या चुटकीशीर सुटू शकतात. भारत सरकार 2026 च्या अखेरपर्यंत वाहन ते वाहन (V2V) संपर्क तंत्रज्ञान आणण्याच्या तयारीत आहे. हे तंत्रज्ञान रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. काय आहे नेमकी ही टेक्नोलॉजी? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

नव्या व्ही टू व्ही टेक्नोलॉजीमुळे वाहने एकमेकांशी थेट बोलू शकतील, आणि मोबाइल नेटवर्क किंवा इंटरनेटची गरज पडणार नाही. या तंत्रज्ञानामुळे विशेषतः धुक्यात किंवा स्थिर वाहनांमुळे होणाऱ्या टक्कर रोखण्यासाठी मदत करेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत ही घोषणा केली. हे तंत्रज्ञान जगातील काही मोजक्या देशांतच उपलब्ध आहे. भारतात ते सुरू झाल्याने रस्ते सुरक्षितता वाढेल.

V2V तंत्रज्ञान कसे कार्य करते?

हे तंत्रज्ञान वाहनांमध्ये एक विशेष उपकरण बसवून कार्य करते, जे सिम कार्डासारखे असते. जेव्हा दोन वाहने जवळ येतात, तेव्हा ते एकमेकांना सिग्नल पाठवतात आणि माहिती आदान-प्रदान करतात. यामुळे रस्त्यावरील वाहनांचे जाळे तयार होते. हे 360 डिग्रीमध्ये कार्य करते. म्हणजे समोर, मागे आणि बाजूने येणाऱ्या धोक्याची सूचना देते. चालकांना त्वरित सावधानता घेण्यास सांगते. याशिवाय, हे प्रगत चालक सहाय्य प्रणाली (ADAS) सोबत जोडले जाईल, ज्यात सेन्सर असलेल्या महागड्या SUV गाड्यांना अपडेट करावे लागेल.

V2V चे फायदे

हे तंत्रज्ञान अपघात टाळण्यासाठी खूप प्रभावी आहे. उदाहरणार्थ, धुक्यात दिसत नसतानाही मागून येणाऱ्या वेगवान वाहनाची किंवा पुढे थांबलेल्या गाडीची माहिती मिळेल. यामुळे अनेक वाहनांच्या ढिगाऱ्या होण्यापासून वाचवता येईल. वाहनांमध्ये सुरक्षित अंतर राखणे सोपे होणार आहे. चालकांना एक प्रकारची 'तिसरी नजर' मिळणार आहे. या तंत्रज्ञानामुळे एकूणच रस्ते सुरक्षितता सुधारणार आणि प्रवास अधिक विश्वासार्ह बनणार आहे.

अंमलबजावणीचे तपशील

या तंत्रज्ञानासंदर्भात 2026 च्या शेवटी नोटिफिकेशन निघणार आहे. नवीन वाहनांपासून याची सुरुवात होईल. त्यानंतर टप्प्याने इतर वाहनांमध्ये लागू केले जाणार आहे. या प्रकल्पाची किंमत अंदाजे 5000 कोटी रुपये आहे. ग्राहकांना एक शुल्क द्यावे लागेल पण त्याची नेमकी रक्कम अद्याप जाहीर नाही. हे तंत्रज्ञान फक्त नवीन गाड्यांमध्येच नव्हे तर जुन्या गाड्यांमध्येही बसवता येईल.

सरकारची भूमिका

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय हे तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्न करतंय. सचिव व्ही. उमाशंकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. हे रस्ते सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल मानले जात आहे. जगात हे तंत्रज्ञान फार कमी देशांत असून भारतासाठी ही मोठी उपलब्धी ठरणार आहे. अपघात कमी करणे आणि रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित बनवणे हा यामागचा हेतू असल्याचे उमाशंकर म्हणाले.

भविष्यात काय? 

हे तंत्रज्ञान ADAS सोबत एकत्रित होणार असून ज्यात सेन्सर असलेल्या गाड्यांना फक्त अपडेट करावे लागणार आहे. भविष्यात रस्त्यावरील वाहने फक्त चालणार नाहीत, तर एकमेकांशी 'बोलतील'ही. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि भारतीय रस्ते जगातील सर्वोत्तम सुरक्षित रस्त्यांमध्ये गणले जाणार आहे. हे तंत्रज्ञान वाहतुकीच्या क्षेत्रात क्रांती आणेल आणि लाखो जीव वाचवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More