सीमेवरच्या वाढत्या तणावात ड्रॅगनने नांगी टाकली, भारतासोबतच्या संबंधांवर चीन म्हणतं...

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव वाढला आहे.

Updated: May 27, 2020, 06:47 PM IST
सीमेवरच्या वाढत्या तणावात ड्रॅगनने नांगी टाकली, भारतासोबतच्या संबंधांवर चीन म्हणतं... title=

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव वाढला आहे. त्यातच आता भारतामध्ये असलेल्या चीनच्या राजदुतांनी दोन्ही देशांच्या संबंधांवर भाष्य केलं आहे. दोन्ही देशांनी त्यांच्या संबंधांपेक्षा मतभेदांना जास्त महत्त्व देऊ नये, असं भारतातले चीनचे राजदूत सुन वीडोंग म्हणाले आहेत. 

'भारत आणि चीन एकत्र कोरोना व्हायरसचा सामना करत आहे. दोन्ही देशांनी त्यांच्यातले नातेसंबंध चांगले ठेवावेत, हेदेखील आमच्यासाठी महत्त्वाचं लक्ष्य आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांमधले संबंध तरुणांना नव्या संधी उपलब्ध करून देतील, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण एकमेकांसाठी धोका नाही,' अशी प्रतिक्रिया सुन वीडोंग यांनी दिली आहे. 

भारत-चीन तणाव : मोदी-डोवाल यांच्यात बैठक

भारत आणि चीन एकमेकांचे शत्रू नाहीत, तर एकमेकांसाठी संधी आहेत. भारत आणि चीन मिळून कोरोना व्हायरसचा सामना करत आहेत, असं वक्तव्य चीनच्या राजदुतांनी केलं आहे. 

भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये लडाखमध्ये तणाव वाढला आहे. त्यातच या प्रकरणात अमेरिकेनेही प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि चीनला वाटलं तर आम्ही मध्यस्थी करायला तयार असल्याचं ट्विट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. भारत आणि चीनमधला सीमा वाद सोडवण्यासाठी अमेरिका इच्छूक आणि सक्षम आहे, असं आपण दोन्ही देशांना सांगितल्याचं ट्रम्प म्हणाले आहेत. 

चीनने लडाखच्या सीमेवर मोठ्या संख्येने सैन्य तैनात केलं, यानंतर भारतानेही सीमेवरची कुमक वाढवली. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार चीन आणि भारताच्या जवळपास तीन चौक्या या एकमेकांपासून अवघ्या दोन किलोमीटरच्या अंतरावर आहेत. तर, तेथे तैनात असणाऱ्या जवानांमध्येही फार अंतर नाही. तेव्हा आता शांततेच्या मार्गाने हा प्रश्न निकाली काढण्यात सैन्य यशस्वी होणार की, येत्या काळात सीमेवरील घडामोडी अशाच सुरु राहणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

 संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची सेना प्रमुखांसोबत बैठक

भारत-नेपाळ भूभाग वाद: नेपाळने घेतलं एक पाऊल मागे