Buddha Purnima 2025 Importance Of Meditation By Gautam Buddha : प्रत्येकाच्या आयुष्यात दु:ख हे आहेच हे निर्विवाद सत्य आहे. समस्या, चिंता, तणाव, संकटे अशा नानाविविध मोर्चांवर दररोज लढा द्यावा लागतो. विद्यार्थी असो वा गृहस्थ, नोकरदार असो वा व्यावसायिक, प्रत्येकांसमाेर समस्यांचे डोंगर उभे आहेत. पण, या समस्यांवर मात करण्याचे सोडून काहीजण डिप्रेसमध्ये जातात आणि मग आत्महत्यासारखं टोकाची पाऊल उचलून आयुष्यच संपवतात. काहीजण व्यसनाच्या आहारी जातो. आयुष्य बरबाद होते. पण, या सर्वांतून फक्त दहा दिवसांत सुटका होऊ शकते. वाचूनच आश्चर्य वाटेल, पण हे शक्य आहे. 2500 वर्ष जुना कोर्स तुम्हाला 10 दिवसांत सगळ्यातून बाहेर काढेल.
या कोर्स मध्ये कोणतेही पुस्तकी ज्ञान शिकवले जात नाही. यात तुम्हाला स्वत:चाच शोध घेण्याचा मार्ग दाखवला जातो. हा कोर्स म्हणजे मेडिटेशन अर्थात विपश्यना ध्यान (Vipassana Meditation). महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मेडिटेशन सेंटर आहेत. दहा दिवसांचा विपश्यना कोर्स केल्यास आयुष्य कसं असावं आणि ते कसं जगावं, याचे उत्तर सापडेल. आता तुम्हाला वाटत असेल की या कोर्ससाठी किती पैसे मोजावे लागतील, तर थांबा... हा कोर्स विनामूल्य असून, दहा दिवसांचे राहणे, खाणे मोफत आहे. एक रुपयाचाही खर्च नाही.
विपश्यना ही भारताची एक अत्यंत प्राचीन ध्यान-विधि आहे. मानवजातीपासून हरवलेली,आजपासून जवळजवळ 2500 वर्षांपूर्वी गौतम बुध्दांनी ही ध्यान विधी पुन्हा शोधून काढली होती. विपश्यना शब्दाचा अर्थ असा की, जी वस्तू खरोखरच जशी आहे, ती त्याच प्रकारे जाणून घेणे. स्व-निरिक्षणाद्वारे आत्मशुद्धी करण्याची ही प्रक्रिया (साधना) आहे.
कुणीही मनाच्या एकाग्रतेसाठी नैसर्गिक श्वासाच्या निरीक्षणाव्दारे सुरूवात करतो. तीक्ष्ण सजगतेने शरीर व चित्ताच्या बदलत्या जातिस्वभावाचे निरिक्षण करु लागतो आणि नश्वरता, दुःख व अहंभावाच्या जागतिक सत्याचा अनुभव घेतो. प्रत्यक्ष अनुभवाद्वारे ह्या सत्याची अनुभूती ही एक शुध्दीकरणाची प्रक्रिया आहे.
हा संपूर्ण मार्ग म्हणजे जागतिक वाद-विषयांवर एक जागतिक उपाय आहे आणि ह्याचे कोणत्याही संघटित धर्म किंवा संप्रदायाशी देणे घेणे नाही. ह्याच कारणामुळे, कुणीही, वंश,समाज किंवा धर्मामुळे होणाऱ्या झगड्याशिवाय कोणत्याही वेळी, ह्याचा मुक्तपणे अभ्यास करु शकतो, आणि सर्वांना एकसारखी फायदेशीर असल्याचे सिद्ध होईल.
- विपश्यना अंधश्रध्देवर आधारीत कर्मकांड नाही.
- ही साधना बौध्दिक मनोरंजन किंवा दार्शनिक वादविवादासाठी नाही.
- ही सुट्टी घालविण्यासाठी किंवा सामाजिक आदानप्रदानासाठी नाही.
- ही रोजच्या जीवनातल्या ताणतणावापासून पलायन करविणारी साधना नाही.
- ही दुःखमुक्तिची साधना आहे.
- ही मनाला निर्मळ करणारी अशी साधना आहे, ज्यामुळे साधक जीवनांतील चढ-उतारांचा सामना शांतिपूर्वक तसेच संतुलित - राहून करु शकेल.
- ही जीवन जगण्याची कला आहे ज्यापासून साधक एका स्वस्थ समाजाच्या निर्मितीमध्ये सहयोगी होतो.
अनुशासन संहिता
शील अर्थात नैतिक वर्तणुक हा साधनेचा पाया आहे. समाधीच्या म्हणजे मनाच्या एकाग्रतेच्या विकासासाठी शील हाच पाया आहे आणि मनाची शुध्दता प्रज्ञेव्दारे होते, यालाच आंतरिक ज्ञान म्हणतात.