कोल्हापुरातल्या एका वऱ्हाड्यानंच लग्नातल्या दागिन्यांवर डल्ला मारला. यामुळं मंगल कार्यालयात एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलीस तपासात जी माहिती समोर आली त्यानं सर्वांनाच धक्का बसला.
कोल्हापुरातल्या एका लग्न समारंभात वेगळाच प्रकार घडला. या लग्नात एक अगंतूक पाहुणा वऱ्हाडी बनून आला. त्यानं दिमाखात फेटा बांधलe. इतर वऱ्हाड्यांप्रमाणं लग्नात मिरवलं. नंतर त्याच लग्नातले दागिने घेऊन अलगद पसार झाला. यानंतर लग्नघराने पोलीस स्टेशनला तातडीनं तक्रार केली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं बाळासो उर्फ अजित प्रकाश पाटील या सराईत चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. तो मूळचा आदमापूरचा आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 4 लाखांचे दागिने हस्तगत केले आहेत. विशेष म्हणजे त्यानं अशा एकूण 21 गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
या वऱ्हाडी चोरानं फक्त कोल्हापूर जिल्ह्यातच नाही तर पुणे, सांगली, साताऱ्यातल्या अनेक लग्न समारंभातही दागिन्यांवर असाच डल्ला मारल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. हा वऱ्हाडी चोरटा लग्न समारंभात चोरलेले दागिने तातडीने विकत नव्हता तर स्टीलच्या डब्यात भरून तो जमिनीत पुरून ठेवायचा. पोलिसी खाक्या दाखवल्यावर चोरटा अजित पाटीलनं स्वत:हूनच पोपटासारखी या मोडस ऑपरेंडीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं शोध मोहीम राबवून खड्ड्यातून एक डबा खोदून बाहेर काढला ज्यात सोन्याचे दागिने ठेवले होते.
सध्या राज्यभर लग्नसराईचा माहोल आहे. अशात लग्नात शेकडो पाहुणे, वऱ्हाडी मंडळी येतात. मात्र त्यातला असा कुणी वऱ्हाडी चोरही निघू शकतो आणि लग्नातल्या दागिन्यांवर डल्ला मारू शकतो. त्यामुळं लग्न घरातल्या मंडळींनी अशा अगंतूक वऱ्हाडींवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं गरजेचं आहे.