Deharji Project In Maharashtra: महाराष्ट्रात आणखी एक धरण पूर्णत्वास येत आहे. या धरणामुळं तीन शहरांना पाणीपुरवठा होणार आहे. या प्रकल्पाचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे गावाजवळून वाहणाऱ्या पश्चिमवाहिनी वैतरणा नदीची उपनदी असलेल्या देहरजी नदीवर हा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत माती व दगडांचा वापर करून धरण बांधण्यात येत असून या प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 95.60 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. त्यापैकी 93.22 दशलक्ष घनमीटर म्हणजे साधारण प्रतिदिन 255 दशलक्ष लिटर इतके पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे.
कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे (केआयडीसी) या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. केआयडीसी व एममएमआरडीए यांच्यातील सामंजस्य करारानुसार एमएमआरडीएने या प्रकल्पासाठी 2599.15 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य केले आहे. केआयडीसीने 27 जुलै, 2006 रोजी मे. पीव्हीआर प्रोजेक्ट्स लि. यांच्याशी प्रकल्प अंमलबजावणीचा करार केला आणि या धरणाद्वारे व्यापक पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठीचा सखोल प्रकल्प अहवाल एमएमआरडीएतर्फे तयार करण्यात येत आहे.
देहरजी नदीवर माती आणि दगडांचा वापर करून बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित धरणाची एकूण साठवणूक क्षमता 95.60 दशलक्ष घनमीटर आहे.
- वापरण्यास उपलब्ध साठवण क्षमता: 93.55 दशलक्ष घनमीटर (255 दशलक्ष लिटर प्रतिदिन).
- धरणाची लांबी: 2450 मीटर; उंची: 71.60 मीटर.
-धरणाचा प्रकार: गेटेड स्पिलवे असलेले मातीचे धरण.
- स्पिलवे गेट्सचा आकार : 12मीटर x 6.5 मीटर (4 गेट्स).
मे, 2025 मध्ये देहरजी मध्यम प्रकल्प सुमारे 80% पूर्ण झाला आहे.
2027 च्या अखेरीस हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या देहरजी मध्यम प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या जलसाठ्याच्या वापरासाठी व्यापक पाणीपुरवठा योजनेचा सखोल प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. तांत्रिक सल्लागाराच्या देखरेखीखाली सर्वेक्षण आणि इतर क्षेत्रकार्य प्रगतीपथावर आहे.
देहरजी धरणामुळे 93.55 दशलक्ष घनमीटर (प्रतिदिन 255 दशलक्ष लिटर) पाण्याची साठवण क्षमता उपलब्ध होईल.
वसई-विरार महानगरपालिकेसाठी 190 एमएलडी पाणी राखीव आहे.
पाणी पुरवठा मार्गावर असलेल्या ग्रामीण भागांसाठी 15 एमएलडी पाणी.
सिडको पालघर क्षेत्रासाठी 50 एमएलडी.
- वसई-विरार महानगरपालिका
- सिडको
- पालघर जिल्हा परिषद
देहरजी मध्यम प्रकल्पामुळे ग्रामीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध होणार आहे, शाश्वत व दीर्घकालीन पाणीपुरवठा सुनिश्चित करणाऱ्या जलस्रोत व्यवस्थापनामुळे कोकण भागातील सामाजिक-आर्थिक वाढीला मदत होणार आहे.