Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खास मैत्रीचं नात आहे. त्यांच्यातील मैत्री अनेकदा कॅमेरासमोरही दिसून येत असते. दरम्यान अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहिण्याचा आवाहन केलंय. अजित पवारांनीच या पुस्तकाचं नावदेखील ठरवलंय. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात जिव गमवावा लागलेल्या निष्पाप भारतीयांना श्रद्धांजली अर्पण केली. या भ्याड हल्ल्याचा निषेध करताना यांचा बदला जेवढ्या लवकर घेता येईल तेवढ्या लवकर घेतला पाहिजे त्यांचा खात्मा केलाच पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्राला समृद्ध राजकीय आणि वैचारिक परंपरा लाभली आहे. आपल्या राज्याला राजकारणाचा सुसंकृतपणा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे लाभला आहे. सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे विचार कसे मांडले पाहिजेत समाज प्रबोधनाची ताकद कशी असते? हे सगळं आपण यशवंतराव चव्हाण साहेबांकडून शिकलो, असे अजित पवार म्हणाले. या महाराष्ट्रातील सुसंस्कृतपणा आपण टिकवला पाहिजे. तो पुढं नेला पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले. राजकारणात आधी ओलावा होता. जवळीक होती. एकमेकांबद्दल आपुलकी आणि प्रेम होतं. तो जिव्हाळा अलीकडच्या काळामध्ये बघायला मिळत नाही, असे ते म्हणाले.माझी जबाबदारी वाढल्यामुळे आता पीडीसीसी बँकेकडे लक्ष देता येत नाही. म्हणून मी संचालक पदाचा राजीनामा दिला. पीडीसीसी बँकेला जागा कमी पडत होती. परवा 58 कोटी रुपये देऊन समोरची पारशी माणसाची एक जागा विकत घेतली आहे. आता बँकेचे बांधकाम सुरू करू असे ते म्हणाले.
1991 साली पहिल्यांदा मी निवडणूक लढवली. त्यावेळेस भाषण करायला भीती वाटायची. भाषणाचा कुठलाही आणि कसलाही अनुभव नव्हता. फॉर्म भरला आणि दगडूशेठ गणपतीला नारळ फोडून भाषण करायची वेळ आली. मला काहीच बोलता येत नव्हतं. प्रतिभा काकी कुठेतरी लांब थांबून ऐकत होती. मग म्हटलं की जे व्हायचं ते होईल. भाषणाला उठलो म्हटलं की, पवारसाहेब एवढं बोलतात तर आपल्यालाही जमेल आणि आता सगळे बघतायेत की मला काय जमलं', असे ते पुढे म्हणाले.
1 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही मोठी रॅली काढली आहे, मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला आम्ही जमणार आहोत. 6 भागातून पाणी आणि माती कार्यकर्त्यांना आणायला सांगितली आहे. त्यादिवशी मुंबईत सभा घेणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सल्ला दिला. मुंबईत गेल्यावर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा एक पुस्तक लिहायचा सल्ला देणार असल्याचे ते म्हणाले. 'फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते असताना एक पुस्तक लिहिल आहे. आता तुम्ही दुसरं पुस्तक लिहा. त्याचं नाव 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' असं द्या', असं ते फडणवीसांना उद्देशून म्हणाले.