महाराष्ट्राच्या विधानसभेचं विशेष अधिवेशन? 'अजित पवारांच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणासंदर्भात मुख्यमंत्री...'

Ajit Pawar Death Special Session Maharashtra Assembly: अजित पवारांच्या विमानाचा 28 जानेवारी भीषण अपघात झाला. बारामती विमानतळावर झालेल्या या अपघातात अजित पवारांचं निधन झालं असून यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतानाच सत्य समोर आणण्यासाठी विशेष अधिवेशाची मागणी केली जातेय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 2, 2026, 03:32 PM IST
महाराष्ट्राच्या विधानसभेचं विशेष अधिवेशन? 'अजित पवारांच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणासंदर्भात मुख्यमंत्री...'
थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत केलं विधान (प्रातिनिधिक फोटो)

Ajit Pawar Death Special Session Maharashtra Assembly: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला. 28 जानेवारी रोजी सकाळी पावणे नऊच्या सुमारास विमान लॅण्डींगच्या वेळेस धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमान धावपट्टीपासून काही फुटांवर असलेल्या 50 ते 100 फूट खोल खड्ड्यात कोसळलं आणि विमानातील इंधनाने पेट घेतल्याने स्फोट झाले. या अपघातामध्ये विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला असून अजित पवारांच्या आकस्मिक निधनाने राष्ट्रवादीच्या समर्थकांनाबरोबरच पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांच्या पार्थिवावर 29 जानेवारी रोजी बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यात आला. अजित पवारांच्या निधानानंतर त्यांच्या विमान अपघातासंदर्भात वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे.

Add Zee News as a Preferred Source

विशेष अधिवेशन बोलवावा

अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला की तो घातपात होता अशी चर्चा सुरु असतानाच अजित पवारांच्या पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरींनी या प्रकरणाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करत हा घातपात असल्याचा आरोप केला आहे. अमोल मिटकरींनी अनेक गोष्टींसंदर्भात शंका उपस्थित करत हा अपघात संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियाबरोबरच 'झी 24 तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्येही मिटकरींनी या अपघातासंदर्भात प्रश्नचिन्हं उपस्थित करत थेट विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. "अजित पवारांच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन विशेष अधिवेशन बोलवावा आणि या घटनेची सत्यता समोर आणावी," असं मिटकरींनी म्हटलं आहे.  

नक्की वाचा >> अजित पवारांचं मुंबई एअरपोर्टवरचं CCTV फुटेज गायब? विमान कोसळलं 8.46 ला मग 7.30 ला त्या नेत्याला कसं कळलं?

त्यांच्या घरात त्यांची चिता जाळणारा कुणी शिल्लक नसेल

एवढ्यावरच न थांबता मिटकरींनी, "घात जर असेल आणि त्यात कोणी निघाला तर त्याच्या घरी पाळणा हलवणारा कोणी राहणार नाही," अशा शब्दांमध्ये त्यांनी संताप व्यक्त केला. असेच विधान त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुनही केलं आहे. “माझा विश्वास आहे आणि माझं मन सांगतंय दादा असे जाऊच शकत नाहीत. ज्यांनी कुणी हा देवमाणूस हिरावून नेण्याचं पाप केलं असेल भविष्यात त्यांच्या घरात त्यांची चिता जाळणारा कुणी शिल्लक नसेल,” असं मिटकरींनी म्हटलं आहे. तसेच या पोस्टमध्ये त्यांनी, "देवा तुला कुठ रे शोधायचं?" असंही भावूक होऊ म्हटलं आहे.

मिटकरींनी मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज सापडत नसल्याचा आरोप केला असून अजित पवारांचं विमान पुण्यात का उतरवण्यात आलं नाही असा सवालही केला आहे. 

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More