Alibaug News : मध्यप्रदेशातील जबलपूर इथं अलीकडील बोट दुर्घटनेनंतर जलवाहतुकीबाबतची भीती अनेकांच्या मनात बसली आहे. त्यातच अलिबागजवळील मुरूड जंजिरा इथं असणाऱ्या जलवाहतुकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
)
प्रफुल्ल पवार, झी मीडिया, अलिबाग : रायगड जिल्ह्यातील लोकप्रिय पर्यटन आणि ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक म्हणजे मुरुड जंजिरा किल्ला. हा जलदुर्ग पाहण्यासाठी दरवर्षी इथं पर्यटकांची मोठी गर्दी असते. किंबहुना पर्यटनावर इथल्या स्थानिकांचा उदरनिर्वाहसुद्धा अवलंबून आहे. मात्र, त्याच पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. (Jabalpur Boat Accident) मध्यप्रदेशातील जबलपूर इथं अलीकडील बोट दुर्घटनेनंतरही मुरूडमध्ये मात्र किल्ल्यापर्यंत जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचंच चित्र दिसून येत आहे. (Alibaug News)
सध्या सुरु असणाऱ्या उन्हाळी सुट्ट्या आणि एकंदरच पर्यटन हंगामामुळे दररोज हजारो पर्यटक मुरूडमध्ये दाखल होत आहेत. ज्यांची पावलं या किल्ल्या वळत असून, तिथं पोहोचण्यासाठी सुमारे 1 ते दीड किलोमीटर अंतर हे लहान प्रवासी बोटीने पार करावं लागतं. मात्र, जेट्टीवर पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्यामुळे अनेक बोट चालकांना बोटी थेट समुद्राच्या पाण्यातच उभ्या ठेवाव्या लागत आहेत. त्यातच किल्ला असणाऱ्या भागात समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांमध्ये बोटी अस्थिरच राहतात, एखादी मोठी लाट बोटीवर धडकले आणि क्षणात बोट लाटेसह डुलू लागते. ज्यामुळे त्यात असणाऱ्या प्रवाशांचाही जीव वरखाली होतो. परिणामी इथं अपघाताचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, अनेक बोटींमध्ये आवश्यक त्या प्रमाणात लाईफ जॅकेटही उपलब्ध नसतात किंवा त्यांचा वापर केला जात नाही. त्यामुळे पर्यटक अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसत आहेत. इथं सुरक्षेच्या नियमांचे पालन होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेट्टी परिसरात गर्दीचं योग्य नियोजन नसल्याने बोटींची अनियंत्रित हालचाल होते. शिवाय, पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता अतिरिक्त जेट्टी किंवा पार्किंग सुविधा उभारण्याची गरज इथं निर्माण झाली आहे. मात्र, याकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आणि नाराजीचा सूरही आळवला जात आहे. इथं कधीकधी वाऱ्याचा वेग आणि आवेगात येणाऱ्या लाटा इतक्या मोठ्या प्रमाणात उसळतात की, एखादी दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून बोट पार्किंगची व्यवस्था, लाईफ जॅकेट सक्ती, तसेच सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी पर्यटक आणि स्थानिकांकडून जोर धरत आहे.
मुरुडच्या किनाऱ्यावर अरबी समुद्राच्या लाटांचा मारा वर्षानुवर्षं झेलत मुरुड-जंजिरा किल्ला समृद्ध सागरी इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. हा भक्कम जलदुर्ग म्हणजे एक अभेद्य गड आहे. मुंबईपासून त्याचं अंतर दक्षिणेला साधारण 165 किमी इतकं आहे. हा किल्ला पाहण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ. या काळात हवामान बहुतांशी समुद्र शांत असतो, ज्यामुळं बोटीतून किल्ल्यापर्यंतचा प्रवास सुखकर आणि आनंददायक ठरतो.