इंडिया आघाडीत बिघाडीवरुन अमित शहांचं मोठं विधान, 'पवार आणि उद्धव यांनी...'

Amit Shah: शिर्डीतील भाजपच्या अधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंसह, शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय..

प्रविण दाभोळकर | Updated: Jan 12, 2025, 06:06 PM IST
इंडिया आघाडीत बिघाडीवरुन अमित शहांचं मोठं विधान, 'पवार आणि उद्धव यांनी...'
अमित शहा

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिर्डी येथे झालेल्या भाजपच्या अधिवेशनाला प्रमुख उपस्थिती दर्शवली. तुमचा आवाज मुंबईपर्यंत आवाज गेला पाहिजे.येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत याहून मोठा विजय आपण मिळवणार आहोत. विरोधक एकही जागा जिंकणार नाहीत याची काळजी घ्या, असे आवाहन अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना केले. 

Add Zee News as a Preferred Source

शिर्डीतील भाजपच्या अधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंसह, शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय... शरद पवारांनी विश्वासघाताचं राजकारण केलं असून उद्धव ठाकरेंनी 2019मध्ये बाळासाहेबांच् विचार सोडल्याचा जोरदार हल्लाबोल अमित शाह यांनी केलाय..संपूर्ण इंडिया आघाडीत बिघाडी सुरु असल्याचंही टोलाही अमित शाहांनी लगावलाय...याच वेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रात भाजपने ऐतिहासिक यश मिळवलं असून ही यशाची परंपरा दिल्लीतही कायम ठेवणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. खरी शिवसेना, खरी राष्ट्रवादी म्हणत अमित शाहांकडून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केली. शरद पवारांच्या दगफटाक्याच्या राजकरणाला मातीत घालण्याचे काम महाराष्ट्राने केलं. हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांशी द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरेंना जनतेने जागा दाखवली. यावेळी अमित शहांनी पवार आणि ठाकरेंवर घणाघाती टीका केली. .. 

लोकसभेनंतर विधानसभेतही आपला विजय होईल हे विरोधकांचं स्वप्न मातीत घालण्याचं काम तुम्ही केलंत. 25 वर्षांनंतर तुम्ही सांगाल की महाराष्ट्रातील हा महाविजय देशाला पटरीवर आणण्यासाठी महत्त्वाचा होता. हे श्रेय पक्षाचे मालक असलेल्या कार्यकर्त्यांचे आहे. घरणेशाहीला थोबाडीत मारत तुम्ही सिद्धांताचे राजकारण चालतं हे दाखवून दिल्याचे अमित शहा म्हणाले. 

उत्तर महाराष्ट्रात 19, कोकणात 16, पश्चिम महाराष्ट्रात 24 जागा आम्ही जिंकल्या. अमित शाहांनी विभागवार जिंकलेल्या जागांची आकडेवारी वाचून दाखवली. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच बाळासाहेबांची शिवसेना तर अजितदादांची राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी असे ते म्हणाले. धोका देण्याची सुरुवात शरद पवारांनी तर शेवट उद्धव ठाकरेंनी केला. या मंडळींना घरी बसवण्याचे काम तुम्ही केलं. अमित शहांकडून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर जोरदार हल्ले चढवण्यात आले. 

येत्या दीड महिन्यात दीड कोटी सदस्य नोंदणीचे टार्गेट पूर्ण करा. येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहे.विरोधक एकही जागा जिंकणार नाहीत याची काळजी तुम्ही घ्या. पंचायत ते संसद भाजपाच्या विजयाचे सूत्रधार बना असे आवाहन अमित शहांनी कार्यकर्त्यांना केले. प्रत्येक निवडणूक भाजप जिंकेल हा संकल्प साई बाबांच्या शिर्डीत करा. भविष्यात कुणी आपल्याशी विश्वासघात करणार नाही इतका मजबूत भाजप तयार करायचा आहे. लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांना भाजपचे सदस्य बनवा, असे आवाहन अमित शहांनी केले. 

पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर दुष्काळमुक्त महाराष्ट्र करणायचे स्वप्न पाहिले, कामही सुरू केले. आता दुसऱ्या टर्ममध्ये मोदीजी आणि फडणवीस प्रत्येक शेतावर पाणी पोहोचवतायत. पुढील निवडणुकीत मतं मागायला येण्यापूर्वी शेतात पाणी पोहोचवणार. यापूर्वीचे लोक आत्महत्या रोखू शकले नाहीत 31 मार्च 2026 पूर्वी देशातून नक्षलवाद संपवणार असल्याचे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केले.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More