वाल्मिक कराडवर गंभीर गुन्हे असताना पोलीस संरक्षण कसं? अंजली दमानियांचा सवाल

वाल्मिक कराडवर गंभीर गुन्हे दाखल असताना देखील त्याला शासकीय पोलीस संरक्षण कसं? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.  

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 18, 2025, 09:37 PM IST
वाल्मिक कराडवर गंभीर गुन्हे असताना पोलीस संरक्षण कसं? अंजली दमानियांचा सवाल

Anjali Damania On Walmik Karad : वाल्मिक कराडवर गंभीर गुन्हे दाखल असताना देखील त्याला पोलीस संरक्षण कसं? असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय. वाल्मिक कराडला जुलै 2022 ते डिसेंबर 2024 पर्यंत पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं. नेमक्या याच काळात वाल्मिक कराडवर गंभीर गुन्हे दाखल झाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय. राज्य सरकारने गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेल्या वाल्मिकला पोलीस संरक्षण कसं दिलं असा सवाल अंजली दमानिया यांनी केलाय. एवढंच नाही तर पोलीस संरक्षणात वाल्मिक कराड गुन्हे करत होता का असा आरोप त्यांनी केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

पोलिसांवर राजकीय दबाव 

या गोष्टी खूप धक्कादायक आहेत. जेव्हा पूर्ण देशामध्ये आम्ही राजकीय कार्यकर्ते म्हणून फिरतो तेव्हा आम्ही अभिमानाने सांगतो की, महाराष्ट्र हे कायद्याने चालणारे राज्य आहे. महाराष्ट्रात कोणीही काद्यापेक्षा मोठं नाही. कोणीही गुन्हा केला तर त्याला कायद्यासमोर उभे केलं जाते. पण सध्या ज्या पद्धतीच्या कहाण्या समोर येत आहेत, त्याने मान शरमेने झुकू लागली आहे. आता तो स्वाभिमान आम्हाला ठेवता येणार नाही. जो महाराष्ट्राबद्दल इतर लोकांना अभिमान होता त्याला बीड प्रकरणाने एक ठेच पोहोचवली आहे. याचा तपास लागला पाहिजे आणि यामधील गुन्हेगाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे. 

 

बीड प्रकरणानंतर अंजली दमानिया यांनी गृहमंत्री खात्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामध्ये गृहमंत्र्यांची अकार्यक्षमता स्पष्ट झाली आहे. कारण पोलीस प्रशासनावर राजकीय हस्तकक्षेपाचा दबाव आहे. जे जे या प्रकरणामध्ये जबाबदार असतील त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. यानंतर अशा गोष्टी घडू नयेत अशी काळजी त्यांनी घेतली पाहिजे अशी प्रतिक्रिया अतुल लोंढे यांनी दिली आहे. 

15 डिसेंबरला तो पोलीस वाल्मिकसोबत कसा? 

वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला तरीही पोलीस संरक्षण कसं होतं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. वाल्मिक कराडचं पोलीस संरक्षण 11 डिसेंबरला काढल्याचा दावा पोलीस करतायत. पण वाल्मिक कराड फरार असताना उज्जैनला गेला होता. त्यावेळी त्याच्यासोबत पोलीस असल्याचा दावा अंजली दमानियांनी केलाय. वाल्मिक कराडनं शेअर केलेला फोटो दुसऱ्या अंगरक्षकानं काढल्याचा दावाही अंजली दमानियांनी केलाय.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More