2051 पर्यंत हिंदूंची लोकसंख्या 54% वर पोहोचेल; माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्रात खळबजनक दावा

बांगलादेशी घुसखोरांविरोधात त्वरित कठोर कारवाई करण्याचे निर्देश  केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.  महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश देण्यात आले आहेत.  माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या मागणीची केंद्रीय गृहमंत्र्यांनी दखल घेतली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 22, 2025, 07:42 PM IST
2051 पर्यंत हिंदूंची लोकसंख्या 54% वर पोहोचेल; माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्रात खळबजनक दावा

Bangladeshi Immigrants In Maharashtra : बांगलादेश आणि म्यानमारमधून अवैध रीतीने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येणाऱ्या घुसखोरांविरोधात त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि अन्य संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. शिवसेना उपनेते माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केलेल्या मागणीची दखल घेत, केंद्रीय गृहमंत्र्यालयाने वरील निर्देश दिले आहेत. अभिनेता सैफ अली खानवर बांगलादेशी घुसखोरांकडून झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या आदेशाने घुसखोरांच्या विरोधातील कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे.

माजी खासदार राहुल शेवाळे यांनी 28 नोव्हेंबर 2024 रोजी गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या निवेदनात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ( TISS ) या संस्थेकडून घुसखोरांविषयी केलेल्या सर्वेक्षणाचा उल्लेख केला होता. शेवाळे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, TISS ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबईत बांगलादेशी आणि म्यानमार मधून आलेल्या घुसखोरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडली असून गंभीर सामाजिक आणि आर्थिक समस्या उद्भवल्या आहेत. काही राजकारण्यांकडून अशा घुसखोरांचे ' वोट बँक ' म्हणून लांगूलचालन सुरू आहे. बेकायदेशीरपणे भारतात आलेल्या या लोकांमुळे स्थानिकांच्या रोजगारावरही परिणाम होताना दिसत आहे.

आपल्या पत्रात शेवाळे यांनी घोसखोरांमुळे होणाऱ्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले आहे. '1961 च्या जनगणनेनुसार मुंबईत हिंदूंची लोकसंख्या ही 88% होती. 2011 च्या जनगणनेत हिंदूंची लोकसंख्या 66% पर्यंत घसरली. हीच टक्केवारी 2051 पर्यंत 54% वर पोहोचेल, अशी भीती राहुल शेवाळे यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. तसेच काही नोंदणीकृत नसलेल्या अवैध सामाजिक संस्था या घुसखोरांना रसद पुरवत असल्याचा थेट आरोप देखील  शेवाळे यांनी केला आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर सामाजिक संस्थांवर देखील कारवाई करण्याची मागणी शेवाळे यांनी केली आहे.

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More