)
Maharashtra Politics: पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला (व्हीएसआय) दिल्या जाणाऱ्या अनुदानाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून देण्यात आले आहेत. पहिल्यांदाच या इन्स्टिट्यूटसंदर्भात असा निर्णय शासनाकडून देण्यात आला आहे. राज्याचे साखर आयुक्त 60 दिवसांमध्ये शासनाला चौकशी अहवाल सादर करणार आहेत. हा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभा खासदार शरद पवारांना मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. असं असतानाच आता या निर्णयावरुन शरद पवारांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवारांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनंतर आता फडणवीसांच्या टार्गेटवर उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याचं सूचक विधान केलं आहे. "राज्यातील ऊस उत्पादनातील वाढीच्या माध्यमातून साखर उद्योगाला चालना देण्यात मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा (VSI) सर्वांत मोठा वाटा आहे. पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली अजितदादांसह सर्वपक्षीय नेते पक्षाच्या पलीकडं जाऊन केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेवर काम करतात. तरीही या संस्थेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश ही केवळ नियमित प्रक्रिया नाही तर भाजपाने ‘ठाण्यानंतर’ आपला मोर्चा आता ‘बारामतीकडं’ वळवल्याचा त्याचा अर्थ आहे," असं रोहित पवार म्हणालेत.
एवढ्यावरच न थांबता सोमवारी भाजपाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केलेल्या विधानाचा संदर्भ देत या विधानंतर आज लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्रीय झाल्याचंही रोहित पवार म्हणालेत. "भाजपला कुबड्यांची गरज नाही हे कालच गृहमंत्री अमित शाह साहेबांनी स्पष्ट केलं आणि सोबतच VSI च्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. हा कुबड्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचा तर प्रयत्न नाही ना! हे लवकरच स्पष्ट होईल," असा उल्लेख रोहित पवारांनी पोस्टमध्ये केला आहे.
तसेच, "महत्त्वाचं म्हणजे जिथं आम्ही कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देतो तिथं सरकार मौन बाळगतं, चौकशी करत नाही, पण राजकीय द्वेषातून एका चांगल्या संस्थेची चौकशी करून संस्थेचं नाव बदनाम केलं जातं, हे भाजपाचं आधुनिक राजकारण आहे. यातून कदाचित भाजपाचा राजकीय डाव साध्य होईल, पण राज्याचं मात्र नुकसान होतंय, त्याचं काय?" असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
राज्यातील ऊस उत्पादनातील वाढीच्या माध्यमातून साखर उद्योगाला चालना देण्यात मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा (VSI) सर्वांत मोठा वाटा आहे. आदरणीय पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली मा. अजितदादांसह सर्वपक्षीय नेते पक्षाच्या पलीकडं जाऊन केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी गेल्या अनेक… pic.twitter.com/n4Sz0dGPtO
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 28, 2025
हवेली तालुक्यामधील मंजरी बुद्रुक येथे असणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये शरद पवार चेअरमन म्हणजेच अध्यक्ष आहेत. पवार हे व्हीएसआयचे प्रमुख नेते आणि निर्णय घेणारे सदस्य असून ते माजी कृषी मंत्री आहेत. शरद पवार हे संस्थेच्या संशोधन व विकासावर मार्गदर्शन करतात. तर अजित पवार हे संस्थेचे ट्रस्टी आहेत. मंडळातील सदस्य म्हणून ते संस्थेच्या कारभारामध्ये सहभाग घेतात. ते उपमुख्यमंत्री असून, साखर उद्योगाच्या धोरणांवर योगदान देतात. दोन्ही नेत्यांकडील ही पदे आणि जबाबदाऱ्या 2022-27 साठीच्या कालावधीदरम्यान आहेत. दर वार्षिक सभेमध्ये दोन्ही नेते सक्रियपणे सहभागी असतात. शरद पवार संस्थेचे संस्थापक नेते म्हणून ओळखले जातात, तर अजित पवार साखर कारखान्यांच्या विकासासाठी प्रयत्न करतात.