राज ठाकरेंचे 'ते' निमंत्रण भाजपने नाकारले; दोन्ही ठाकरेंची युती भाजपला रुचेना का? मुंबईत काय चाललेय?

मुंबई महापालिकेच्या धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या प्रतिसभागृहाचे आमंत्रण भारतीय जनता पक्षाने नाकारल्याचे समजत आहे. मनसेने शिवसेना उबाठा पक्षाचे नेते माजीमंत्री आदित्य ठाकरे यांना आमंत्रित दिल्याने, भाजपने ही भूमिका घेतल्याची माहिती मिळत आहे

नेहा चौधरी | Updated: Apr 26, 2025, 11:04 PM IST
राज ठाकरेंचे 'ते' निमंत्रण भाजपने नाकारले; दोन्ही ठाकरेंची युती भाजपला रुचेना का? मुंबईत काय चाललेय?

ओम देशमुखसह कृष्णात पाटील झी 24 तास मुंबई : मनसेकडून प्रतिसभागृहाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी भाजपसह शिवसेना ठाकरे पक्षालाही निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, शिवसेना ठाकरे पक्षाला बोलावलं म्हणून भाजपनं मनसेच्या या कार्यक्रमाकडे पाठ फिरवलीय. त्यामुळे मनसे-भाजपमध्ये दुरावा आल्याची चर्चा आहे. (BJP rejects Raj Thackeray invitation Is BJP not interested in the alliance of both Thackerays Mumbai Maharashtra Politics News)

मुंबई मनपाच्या धर्तीवर मनसेनं प्रतिसभागृहाचं आयोजन केलं...मात्र यावरून आता भाजप आणि मनसेत दुरावा आल्याचं चित्र आहे. आशिष शेलार, आदित्य ठाकरेंसह प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांना यासाठी निमंत्रण पाठवलं होतं. मात्र मनसेनं शिवसेना ठाकरे पक्षाला निमंत्रण दिल्यामुळे नाराज झालेल्या भाजपनं मनसेच्या या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. भाजप नेते प्रभाकर शिंदे यांनी संदीप देशपांडेंना पत्र लिहून नकार कळवलाय.

महापालिका प्रतिसभागृहात 25 वर्षे पराकोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्यांसोबत चर्चेत सहभागी होण्यापेक्षा भाजपा रस्त्यावर उतरून मुंबईकरांच्या समस्या सोडविण्यासाठी यापूर्वी प्रमाणेच सातत्याने अग्रेसर व कटिबद्ध राहील. पुनश्च एकदा आपल्या निमंत्रणाबद्दल आभार, असं भाजपनं आपल्या पत्रात म्हटलंय.

मनसेनं आदित्य ठाकरेंना आमंत्रण दिलं. पण परदेशात असल्यामुळे आदित्य ठाकरेही या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीत. शिवसेना ठाकरे पक्षाला निमंत्रण दिलं म्हणून नाराज झालेल्या भाजपनं मनसेच्या या कार्यक्रमापासून दोन हात लांब राहणं पसंत केलं. यावरून मनसेच्या संदीप देशपांडेंनी भाजपला टोला लगावला.

भाजपनं मनसेच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षानं भाजपला चिमटे काढलेत. मनसे आणि राज ठाकरेंच्या जवळिकीवरून शिवसेना ठाकरे पक्षानं मनसेलाही मोलाचा सल्ला दिलाय. एकीकडं राज्यात सध्या ठाकरे बंधूंच्या मिलनाच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच भाजपनं मनसेचं निमंत्रण नाकारल्यानं नव्या चर्चेला सुरुवात झालीय. गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यानं पालिकेचं सभागृहचं भरलं नाही. त्यामुळं लोकांच्या अनेक प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष नसल्यानं मनसेनं महापालिकेच्या धर्तीवर प्रतिसभागृह आयोजित करण्याची घोषणा केली होती. या कार्यक्रमाला मनसेकडून ठाकरे पक्षाला निमत्रंण दिल्यावरून भाजप नाराज झालाय. त्यामुळं आता मनसे आणि भाजपमधला दुरावा वाढल्याची चर्चा आहे.