'हिताचा विचार...' ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याआधी CM फडणवीसांचा आमदारांना महत्त्वाचा सल्ला

Maharashtra Political News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीरही झालेल्या नसतानाच राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.    

सायली पाटील | Updated: Jul 4, 2025, 08:27 AM IST
'हिताचा विचार...' ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याआधी CM फडणवीसांचा आमदारांना महत्त्वाचा सल्ला
CM devendra fadnavis guides mlas for upcoming elections as to focus on voters benefits and not on contractors

Maharashtra Political News : राज्यशासनानं हिंदी भाषेसंदर्भात काढलेले 2 शासन निर्णय मागे घेतल्यानंतर हा मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा विजय झाला आहे असा एकच सूर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आळवला. यानंतर या दोन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चाना आणखीच उधाण आलं. युतीबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती अथवा वृत्त समोर नसलं तरीही शासन निर्णय रद्द करण्यात आल्याबद्दल आता ठाकरे बंधू विजयी मेळाव्यात मात्र एकत्र दिसणार असल्यानं संपूर्ण राज्यासह राजकीय वर्तुळाचं लक्षसुद्धा याच घडामोडीकडे लागलं आहे. (Uddhav Thackeray Raj thackeray Morcha) 

Add Zee News as a Preferred Source

इथं या मेळाव्यानं नजरा वळवलेल्या असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा सावधगिरीनं पावलं उचलत पक्षातील आमदारांना काही स्पष्ट सूचना केल्या आहेत. राज्यातील एकंदर राजकीय स्थिती पाहता फडणवीसांनी (BJP MLA) भाजपा आमदारांना दिलेल्या या सूचना आणि सल्ले पाहता आगानी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये त्यांना पक्षाकडून दमदार कामगिरीच अपेक्षित असल्याचं स्पष्ट होत आहे. 

भाजपातील आमदारांना नुकतंच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी अर्थात वर्षा बंगल्यावर स्नेहभोजनासाठी बोलवण्यात आलं होतं. यावेळी विकासकामांसह मतदारांच्या हितासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं. ‘मतदार आणि मतदारसंघंच्याच हिताचा विचार करून कामं करा. कॉन्ट्रॅक्ट, टेंडरच्या मागे लागू नका, आपल्या पक्षाचा संस्कार वेगळा आहे, त्यानुसार पुढे जा’ असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. 

मतदारांचं हित केंद्रस्थानी ठेवत त्यांचं भलं कशात आहे याचा विचार करूनच कामं केली पाहिजेत अशी सूचना देत. आमदार निधीचा योग्य वापर करा असंही सांगितलं. राज्यासमोर असणाऱ्या आर्थिक अडचणींटा फटका विकासकामांना बसणार नाही याची काळजी घेतली जाईल या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला. 

विरोध करण्याची भूमिका घेऊ नका

गेल्या काही काळापासून भाजपामध्ये होणारे प्रवेश पाहता ही बाबही फडणवीसांनी आपल्या वक्तव्यातून अधोरेखित केली. पक्षात येणाऱ्यांना विरोध करण्याची भूमिका घेऊ नका असं सांगत सध्या होणारे पक्षप्रवेश फायद्याचेच असून मतदारसंघासाठी तुमचा (आमदारांचा) आणि पक्षसंघटनेचा शब्दच अंतिम असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

‘संस्थांच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्याच आहेत’

‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्याच आहेत’, असं म्हणताना अपवादात्मक परिस्थितीत अडचणी येतील अशा शब्दांत त्यांनी आमदारांना सावधही केलं आणि त्या सोडविण्याचा प्रयत्नही केला जाईल असा विश्वास दिला. 

सोशल मीडियाचा वापर.... 

केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयांसह, भाजपाची कामगिरी सामान्यांपर्यंत कशी पोहोचेल यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याचा सल्लाही मुख्यमंतर्यांनी दिला. यावेळी त्यांनी स्वतःसोबतच चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण यांसारख्या नेत्यांची उदाहरणंसुद्धा दिली. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More