कुत्र्याला लागला हरिनामाचा व्यासंग, टाळमृदंगाच्या गजरात दिला अखेरचा निरोप

Parabhani Dog Death: परभणीच्या मानवत तालुक्यात मानोली नावाचं गाव आहे. या गावावर शोककळा पसरलीये.

प्रविण दाभोळकर | Updated: Nov 16, 2025, 09:45 PM IST
कुत्र्याला लागला हरिनामाचा व्यासंग, टाळमृदंगाच्या गजरात दिला अखेरचा निरोप

Parabhani Dog Death: राज्यभरात सध्या भटक्या कुत्र्यांनी धुमाकुळ घातलाय. या कुत्र्यांच्या भितीमुळे लहान मुलांचं घराबाहेर पडणंही मुष्कील झालंय. भटक्या कुत्र्यांची समस्या अगदी सुप्रिम कोर्टापर्यंत पोहोचलीय. दुसरीकडे मात्र एका गावावर कुत्र्याच्या निधनाने दुख:चा डोंगर कोसळलाय. असं कुठलं  गाव आहे? आणि काय आहे या गावच्या कुत्र्याची गोष्ट? जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

परभणीच्या मानवत तालुक्यात मानोली नावाचं गाव आहे. या गावावर शोककळा पसरलीये. आणि त्याला कारण ठरलाय गावातला पांडुरंग नावाचा कुत्रा. पांडुरंग या कुत्र्याला जणू हरिनामाचा व्यासंगच लागला होता. त्यामुळे गावात भजन किर्तन सुरु झालं की जिथं असेल तिथून हा कुत्रा या किर्तनसोहळ्यात सहभागी व्हायचा. मंदिरात सुरु असलेल्या किर्तनात एखाद्या भाविकाप्रमाणे शांत उभा राहायचा. मग टाळकरी, माळकरी या पांडुरंगाच्या भोवती फेर धरुन भजन किर्तन सुरु करायचे. गावात रोज सकाळी 4 वाजता वैष्णावांची प्रभात फेरी काढण्याची प्रथा. या प्रभात फेरीतही पांडुरंग आवर्जुन यायचा. असा हा पांडुरंग गावातील लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचाच लाडका होता.

मात्र एका अज्ञात वाहनाची धडक बसल्यानं तो गंभीर जखमी झाला. गावक-यांनी त्याला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. पांडूरंगाचा मृत्यू झाला आणि ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले.. 

पांडुरंगाच्या अंत्यविधीला ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. टाळ मृदंगाच्या गजरात गावात दिंडी काढत गावक-यांनी लाडक्या पांडुरंगाला अखेरचा निरोप दिला. आणि गावातील मंदिराच्या पाठीमागेच त्याचा दफनविधी केला. एकीकडे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सुप्रिम कोर्टात गाजत असताना दुसरीकडे मानवतच्या ग्रामस्थांनी दाखवलेला मानवतेचा धडा खरोखर मन जिंकणारा आहे.

FAQ 

१: कोणत्या गावात कुत्र्याच्या निधनाने शोककळा पसरली आहे?

उत्तर: परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मानोली गावात पांडुरंग नावाच्या कुत्र्याच्या निधनाने शोककळा पसरली आहे. हा कुत्रा गावातील भजन-कीर्तन आणि प्रभात फेरीत सक्रिय सहभागी असायचा, त्यामुळे तो सर्वांचा लाडका होता.

२: पांडुरंग कुत्रा कशामुळे गावकऱ्यांचा आवडता होता?

उत्तर: पांडुरंग कुत्र्याला हरिनामाचा व्यासंग लागला होता. गावात भजन-कीर्तन सुरू झाले की तो शांतपणे सहभागी होऊन उभा राहायचा. रोज सकाळी ४ वाजता निघणाऱ्या वैष्णवांच्या प्रभात फेरीतही तो आवर्जून येत असे, ज्यामुळे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण त्याच्यावर प्रेम करत.

३: पांडुरंग कुत्र्याच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी काय केले?

उत्तर: एका अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पांडुरंगाला वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी खूप प्रयत्न केले, पण त्याचा मृत्यू झाला. अंत्यविधीसाठी टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी काढून गर्दी केली आणि गावातील मंदिराच्या मागे त्याचा दफनविधी केला.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More