Education News : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगल्या नोकरीच्या शोधात प्रत्येकजण असतो. अनेकदा याच चांगल्या नोकरीच्या शोधात असताना काही मंडळी आर्थिक पाठबळाअभावी किंवा इतर काही कारणांनी त्यांच्या स्वप्नाची आणि शिक्षणाची पूर्ण दिशाच बदलतात. आता मात्र तसं होणार नाही, कारण भवितव्याविषयी जे स्वप्न पाहिलं जाईल, ते साकारही होईल आणि यासाठी मदत होणार आहे ती म्हणजे एका नव्या शैक्षणिक धोरणाची. ज्यामुळं वैमानिक होण्याचं अनेकांचच स्वप्न आता साकार होणार आहे.
आर्ट्स, कॉमर्सचे विद्यार्थीही आता बनणार वैमानिक
आर्ट्स आणि कॉमर्स अर्थात कला आणि वाणिज्य या शाखांमधून शिक्षण घेणाऱ्यांना करिअरच्या काही निर्धारित वाटांवर पुढे जाण्याची संधी मिळते. पण, या शाखांमध्ये शिक्षण घेत असूनही वैमानिक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांचं काय? अपेक्षित शाखेतून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण न केल्यानं अनेकदा या स्वप्नाचा त्याग करावा लागतो.
मात्र आता असं होणार नाही, कारण वरील शाखांमध्ये शिकणाऱ्यांनाही येत्या काळात वैमानिक होत आपल्या स्वप्नांनाही उत्तुंग झेप घेण्याचं बळ देता येणार आहे. सध्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयात यासंदर्भातील धोरणावर विचार सुरू असून, त्याची निश्चिती झाल्यानंतर नागरी हवाई मंत्रालयाकडे या धोरणाबबातचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्याच्या घडीला व्यावसायिक वैमानिक होऊ इच्छिणाऱ्यांना विज्ञान म्हणजेच सायन्स शाखेतून किमान 12 वी उत्तीर्ण असण्याची अट आहे. त्यातही भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय अनिवार्य आहेत. 1990 च्या दशकापासून हा नियम लागू करण्यात आला होता. त्याआधी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही वैमानिक होता येत होतं.
पण, या नियमात बदल झाला आणि अनेकांचा स्वप्नभंग झाला. आता मात्र सध्याच्या नियमातही बदल करत कला व वाणिज्य शाखेतून 12 वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील वैमानिक होण्याची संधी देण्याचा विचार डीजीसीएने सुरू केला आहे.
खासगी विमानांची मालकी असणारी मंडळी ती विमानं उडवताना तिथं 12 पर्यंतचं शिक्षण विज्ञान शाखेतूनच असावं ही अट लागू होत नाही, मग व्यावसायिक विमान उड्डाणासाठीच ही सक्ती का, असा प्रश्न वैमानिक संघटनेनं वेळोवेळी उपस्थित केला आहे. तेव्हा आता डीजीसीए वैमानिक भरतीच्या नियमात बदल करणार का आणि हा बदल नेमका कधीपर्यंत केला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.