Maharashtra Education News : इयत्ता सहावीचं शैक्षणिक वर्ष महत्त्वाचं. दहावीच्या निकालांची उत्सुकता असतानाच शिक्षण विभागानं असा कोणता निर्णय घेतला? पालकांच्याही नजरा याच निर्णयाकडे...
)
Maharashtra Education News : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या निकालांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच आता अचानकत इयत्ता सहावीच्या बातम्यांनी लक्ष वेधलं आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे नव्या अभ्यासक्रम आराखड्याचं. ठराविक कालावधीनंतर, शिक्षण व्यवस्थेत जागतिक स्तरावर होणारे बदल आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरील त्याचे परिणाम घेता शिक्षण विभागाकडून त्याबाबतचा निर्णय घेतला जातो. (Maharashtra Class 6 Syllabus Change Latest Update)
इयत्ता सहावीच्या नव्या शैक्षणिक अभ्यासक्रम आराखड्याला राज्यस्तरीय समितीनं मंजुरी दिली असून, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली याबाबतचा निर्णय घेण्यात आला. ज्यामुळं दुसरी, तिसरी आणि चौथीच्या अभ्यासक्रमामागोमाग आता इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमातही बदल झाले आहेत. नव्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच जून महिन्यापासून हा अभ्यासक्रम लागू होणार आहे.
शालेय शिक्षण मंत्र्यांच्या माहितीनुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या धर्तीवर अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी निर्धारित करण्यात आली आहे, ज्यास सुकाणी समितीनं मंजुरी दिली आहे. अभ्यासक्रम समन्वय समितीनं या आराखड्यास अंतिम मान्यता दिल्यानंतर नव्या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तक निर्मिती, छपाई केली जाईल.
नव्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं शिक्षकांनासुद्धा त्यासाठीचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ज्याचं आयोजन एससीईआरटीच्या माध्यमातून करण्यात येईल. राज्यस्तरावर हे प्रशिक्षण आयोजित केलं जाईल ज्यानंतर जिल्हा स्तरावर त्याचं आयोगन होऊन यानंतर नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू होईल. दरम्यान, नव्या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तकं तयार करण्यात बालभारती महत्वाची भूमिका बजावेल. नव्या शैक्षणिक सत्राच्या आधी ही पुस्तकं उपलब्ध करून देण्याचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलं आहे. टप्प्याटप्प्यानं विविध इयत्तांच्या अभ्यासक्रमांमध्ये होणारा बदल हा विद्यार्थ्यांचं भवितव्यं आणि गुणवत्तेवर आधारित शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवत केला जात आहे.
सध्या शालेय विद्यार्थी उन्हाळी सुट्टीचा आनंद घेत असली, तरीही जून महिन्यात शाळांचे वर्ग पुन्हा भरणार आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या माहितीनुसार राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमित आणि उच्च माध्यमिक शाळा 15 जूनपासून सुरू होणार आहेत. विदर्भातील शाळा सहसा 30 जून रोजी सुरू होतात मात्र, यंदा राज्य शिक्षण मंडळाच्या सर्वच शाळांना एकसमान वेळापत्रक लागू असल्यानं तिथंसुद्धा 15 जूनलाच शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळं नव्या अभ्यासक्रमासह, नव्या पुस्तकांसग विद्यार्थीमित्रांनो, शाळेसाही तयार राहा!!!