)
Eknath Shinde Dasara Melava 2025: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबईत त्यांच्या पक्षाचा दसरा मेळावा पार पडला. या दसरा मेळाव्यात शिंदेंच्या सेनेच्या मोजक्या नेत्यांनी भाषणं केली. या नेत्यांमध्ये ज्योती वाघमारे यांचाही समावेश होता. ज्योती वाघमारेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून ते आदित्य ठाकरेपर्यंत सर्वांवरच आपल्या भाषणातून निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. आदित्य ठाकरेंचा 'पेंग्वीन' असा उल्लेख करत ज्योती वाघमारेंनी घणाघाती टीका केली. दरम्यान, मराठवड्यातील पूर परिस्थितीदरम्यान शिंदेंच्या सेनेनं पाठवलेल्या मदतीच्या सामनावर शिंदे तसेच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो लावण्यावरुन उद्धव ठाकरेंनी आक्षेप नोंदवल्याच्या मुद्द्यावरुन ज्योती वाघमारेंनी थेट फोटो दाखवत टीका केला. विशेष म्हणजे ही टीका करताना त्यांनी उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरेंचाही उल्लेख केला.
अतिवृष्टीच्या काळात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं शेतकरी आणि पूरग्रस्तांना मदत केली होती. मात्र शिंदे सेनेकडून मदत साहित्यावर फोटो लावले म्हणून उद्धव ठाकरेंसहीत त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती केली. या टीकेला उत्तर देताना ज्योती वाघमारेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या मदतीच्या सामानावरही फोटो असल्याचा दावा केला. हा दावा करताना ज्योती वाघमारेंनी ठाकरेंच्या सेनेनं पुरग्रस्त भागातील तरुणींना वाटलेल्या सॅनिटरी पॅड्सच्या पाकिटांवर आदित्य ठाकरेंचे फोटो असल्याचा दावा केला.
ठाकरेंच्या पक्षाने वाटप केलेल्या मदत कार्यातील वस्तूंचे फोटो दाखवत ज्योती वाघमारेंनी, "सॅनिटरी पॅडवर पेंग्वीनचे फोटो. सॅनिटरी पॅडवर आदित्य ठाकरेंचे फोटो लावून वाटण्याचं काम या उबाठाने केलं. आदित्य ठाकरे तुम्हाला बहीण नाही माहितीये. अहो रश्मी वहिनी, हेच संस्कार दिले का, तुमच्या पोराला? तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा ग्रीन कार्पेट घालून दौरा केला. मात्र शिंदे मदत करतात," असं म्हणत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच "लाडक्या बहिणींनी पेंग्वीनचं लीड 70 हजारांवरुन 7 हजारांवर आणलं आहे," असा टोलाही ज्योती वाघमारेंनी लागवला.
ज्योती वाघमारेंनी शिंदेंच्या शिवसेनेचे समर्थक हे मावळे असून ठाकरे समर्थक कावळे असल्याचा टोला लागवला. "आज इथे जमलेले आहेत हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे मावळे आणि तिकडे जमले आहेत ते कोविड काळात मढ्यावरच्या टाळूचं लोणी खाणारे कावळे आहेत. तिकडे जमले आहेत ते सोनियांच्या पायाशी ज्यांनी खुर्चीसाठी झालेले लाचार," असंही ज्योती वाघमारे म्हणाल्या. तसेच पुढे बोलताना, "जे हिंदुत्व विसरले त्यांनी हिंदुत्व विसरा मेळावा साजरा करावा," असाही टोला ज्योती वाघमारेंनी लगावला.