Guardian Ministers For Raigad: महायुतीचं सरकार आल्यापासून ते आजपर्यंत रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा काही सुटत नाहीय.

Guardian Ministers For Raigad: महायुतीचं सरकार आल्यापासून ते आजपर्यंत रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा काही सुटत नाहीय. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झाडल्यात. मात्र आता रायगडला पालकमंत्री नसल्यानं जिल्ह्याच्या विकास कामांवर परिणाम झाल्याचं खासदार सुनिल तटकरेंनी कबुल केलंय. त्यामुळे पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रिपदाची जोरदार वादाला सुरूवात झालीय..
राज्यात मोठ्या बहुमतात महायुतीचं सरकार आलं. सरकार स्थापन होऊन अर्ध वर्ष उलटलं मात्र अद्यापही रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवण्यात महायुतीच्या पक्षश्रेष्ठींना यश आलेलं नाहीय.. जाहिर केलेल्या पालकमंत्र्यांच्या नावाला स्थगिती देण्यात आली आणि त्यानंतर काही हा तिढा सुटायचं नाव घेत नाहीय... त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पालकमंत्रीपदासंदर्भात एक मोठं विधान केलंय.. जिल्ह्याला पालकमंत्री असणं आवश्यक आहे. पालकमंत्री नसल्यानं विकासावर परिणाम होत असल्याचं सुनिल तटकरे यांनी म्हटलंय. तर पालकमंत्रिपदासंदर्भात लवकर निर्णय व्हावा अशी अपेक्षाही तटकरे यांनी यावेळी व्यक्त केलीय..
पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला उशीर झाल्यानं नाशिक आणि रायगडच्या विकासावर परिणाम झाल्याची कबुली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.. तर लवकरात लवकर सरकार यावर निर्णय घेणार असल्याचं आश्वासन यावेळी बावनकुळे यांनी दिलंय..
पालकमंत्रिपदावरून शिंदेंचे आमदार वारंवार नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळताहेत.. काहीच दिवसांपूर्वी पालमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून महेंद्र थोरवेंनी देवेंद्र फडणवीसांची तुलना थेट उद्धव ठाकरेंसोबत केली होती. तीन आमदार असताना शिवसेनेला पालकमंत्रिपद मिळालं नाही. उद्धव ठाकरेंनी देखील रायगडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला दिलं होतं. आणि फडणवीसांनीही तेच काम केलंय. असं म्हणत महेंद्र थोरवेंनी नाराजी व्यक्त केलीय.
एकीकडे रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटत नाहीय. तर दुसरीकडे रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. दोन्हीही पक्ष रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहे. आणि त्यातून आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी पाहायला मिळताहेत. आता महायुतीचे नेते यावर तोडगा कसा काढणार ते पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.