Ajit Pawar Plane Crash: विमान खाक, मृतदेहांचा कोळसा मात्र कागद का नाही जळाले? थक्क करणारं कारण समोर

Ajit Pawar Death In Plane Crash Why Paper Did Not Catch Fire: अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्या ठिकाणी मृतदेह अगदी जळून कोळसा झाले तरी कागद मात्र जळाले नाहीत, असं का झालं? यामागील कारण काय? समजून घ्या...

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 4, 2026, 01:34 PM IST
Ajit Pawar Plane Crash: विमान खाक, मृतदेहांचा कोळसा मात्र कागद का नाही जळाले? थक्क करणारं कारण समोर
अजित पवारांच्या विमान अपघातानंतर त्या कागदांची चर्चा (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

Ajit Pawar Death In Plane Crash Why Paper Did Not Catch Fire: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा 28 जानेवारी रोजी बारामतीमधील विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये विमानातील सर्वांचा मृत्यू झाला. विमान कोसळल्यानंतर विमानाला मोठी आग लागली. विमान कोसळल्याचं लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र मदतीसाठी जाण्याआधीच पुन्हा पडलेल्या विमानाचा मोठा स्फोट झाला. त्यामुळे मदतीसाठी पुढे आलेले स्थानिक गावकरीही जीवाच्या भितीने दूर पळाले. मात्र नंतर अपघात झालेल्या ठिकाणी एवढी आग लागलेली असूनही विमानातील फाइल्समधील कागद जसेच्या तसे विखुरलेले दिसून आले. हे कागद कसे जळाले नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडला.

Add Zee News as a Preferred Source

अगदी अजित पवारांच्या पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरींनीही हा अपघात आहे की घातपात असा सवाल उपस्थित करताना हे कागद कसे जळाले नाहीत? असा सवाल विचारला आहे. काही महिन्यांपूर्वी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताच्या ठिकाणीही भगवत गीतेची प्रत जशीच्या तशी आढळून आल्याची आठवणही अजित पवारांच्या विमानाच्या अपघातस्थळी विखुरलेले कागद पाहून अनेकांना झाली.  मृतदेह ओळखण्याजोगे नव्हते, इतके ते जळून खाक झाले होते. मात्र, विमानातील कागदपत्रे (डॉक्युमेंट्स) जळाली नाहीत आणि ते विखुरलेल्या अवस्थेत सापडली. असं का झालं? याबद्दलच जाणून घेऊयात...

नक्की वाचा >> 'अजित पवारांबरोबर होती भाजपाच्या भ्रष्टाचाराची फाईल? ते मुंबईतून बारामतीला..', 'सहावी व्यक्ती..'; खासदाराचा सवाल

विमान अपघातानंतर कागद जळत नाहीत? 

विमान अपघातात विमानाच्या मुख्य गाभ्याला म्हणजेच बॉडीला आग लागली तरी विमानातील सर्व वस्तू जळून खाक होत नाहीत. अर्थात यासाठी काही वैज्ञानिक आणि काही परिस्थितीजन्य कारणं असू शकतात हे यापूर्वीच्या अनेक अपघातांकडे पाहिलं तर सहज लक्षात येईल.

अपघाताच्या प्रभाव कसा आणि किती?

विमान कोसळल्यानंतर त्यामधील इंधन पेट घेतं आणि भडका उडतो. मात्र विमान जमीनीवर आदळ्यानंतर जी जोरदार धडक बसते त्यामुळे विमानातील हलक्या वस्तू दूरवर फेकल्या जातात. यामध्ये कागदपत्रे, लहान आकारच्या बॅग किंवा विमानाच्या मुख्य बॉडीपासून सहज वेगळे होणाऱ्या भागांचा समावेश होतो. त्यामुळे मुख्य विमानाच्या बॉडीला आग लागली तरी कागद आणि इतर मोठ्या गोष्टी आग लागलेल्या ठिकाणापासून दूर पडू शकतात. 

नक्की वाचा >> Ajit Pawar Plane Crash: 'विमानाच्या दरवाजातून कोणीतरी बाहेर पडण्याचा...'; सरपंचाने सांगितला थरार

...म्हणून विमानाचा मधला भाग जास्त जळतो

विमान कोसळल्यानंतर आग लागण्याचं मुख्य कारण जेट फ्युएल म्हणजेच ज्याला सामान्य भाषेत व्हाइट पेट्रोल म्हणतात तेच असते. साधारणपणे विमानाची इंधन टाकी ही मध्यभागी असल्याने त्याच ठिकाणी भडका उडतो. म्हणूनच विमान जमिनीला धडकल्यानंतर झालेल्या आघातामुळे कागद जर आग लागलेल्या विमानाच्या बॉडीपासून दूर पडले तर ते जळण्याची शक्यता कमी होते. असाच प्रकार बारामतीमध्ये घडला.  

आगीची तीव्रता आणि कालावधी किती?

विमान अपघातानंतर लागणारी आग ही तीव्र स्वरुपाची असते. त्यातही व्हाइट पेट्रोल अधिक ज्वलनशील असल्याने आगीचा भडका उडतो आणि स्फोटही होतात. मात्र या आगीचं वैशिष्ट्यं म्हणजे ही आग एकाच जागी लागते. ती वणव्यासारखी पसरत नाही. म्हणूनच दूरवर पडलेले कागद जळत नाहीत. साधा कागदाचा तुकडा देखील पुरेसा ऑक्सिजन आणि उष्णतेच्या संपर्कात आला नाही तर जळत नाही.

कागद जळण्यामागील विज्ञान महत्त्वाचं

कागद जळण्यासाठी लागणारं तापमान म्हणजेच इग्नेशन पॉइंट बिंदू सुमारे 250 सेल्सिअसपर्यंत असतो. त्यामुळे कागद आगीच्या संपर्कात अगदी कमी वेळ आला किंवा हवेच्या प्रवाहामुळे उडून गेला तर तो जळत नाही. मात्र आगीमुळे या ठिकाणी फारशी हवा वाहत नाही आणि आग लागलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर पडलेले कागद फारसे दूरवर जात नाहीत. मात्र ते जळतही नाहीत. 

नक्की वाचा >> अजित पवारांचं मुंबई एअरपोर्टवरचं CCTV फुटेज गायब? विमान कोसळलं 8.46 ला मग 7.30 ला त्या नेत्याला कसं कळलं?

कागदाचा दर्जाही महत्त्वाचा

याशिवाय कागद कोणत्या प्रकारचे आणि दर्जाचे आहेत यावरही ते जळणार की नाही हे अवलंबून असतं हे लक्षात घेतलं पाहिजे. उदाहरण सांगायचं झालं तर लॅमिनेटेड, फायर रेझिस्टंट कागदही असतात. हे कागद सहज जळत नाहीत. त्यामुळेच कागदाचा दर्जाही महत्त्वाचा असतो.

(टीप - सदर मजकूर सामान्य माहितीवर आधारित आहे.)

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More