शेतमाल वाचवण्यासाठी छातीभर पाण्यातून शेतकऱ्याची कसरत; साताऱ्यातील Video पाहाच

Satara Farmer News: सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शेतमाल वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा छातीभर पाण्यातून जीवघेणा प्रवास. व्हिडीओ एकदा पाहाच.  

Intern | Updated: Jul 1, 2025, 03:02 PM IST
शेतमाल वाचवण्यासाठी छातीभर पाण्यातून शेतकऱ्याची कसरत; साताऱ्यातील Video पाहाच

Satara Farmer News: सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात पुसेगाव-फलटण मार्गावरील वेटण ओढ्यावर अजूनही पूल नसल्यामुळे काटेवाडी शिवारातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नेर तलावातील पाण्याचा फुगवटा या ओढ्यात साचल्यामुळे शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा छातीइतक्या पाण्यातून बाहेर काढावा लागत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी 14 मजुरांच्या मदतीने प्रति पिशवी 90 रुपये खर्च करून तब्बल 400 फूट अंतरावरून कांदा बाहेर काढला. 

Add Zee News as a Preferred Source

मजुरांनी जीव धोक्यात घालून मदत केली, याचे समाधान शेतकऱ्यांना असले तरी कांद्याला योग्य दर न मिळाल्याने त्यांच्यात नाराजी आहे. या भागात पाण्याच्या अडथळ्यामुळे यंत्र किंवा बैलांच्या सहाय्याने शेती करणे अशक्य झाले असून, शेतकरी हातानेच पेरणी करत आहेत. त्यामुळे या वेटण ओढ्यावर किमान साकव पूल तरी लवकरात लवकर बांधावा, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. सध्या या परिस्थितीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ग्रामीण भागातील हलाखीची स्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पुढील 5 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा

दरम्यान, यंदा मान्सूनने 15 दिवस आधीच देशात प्रवेश केला असून, संपूर्ण देशभर तो चांगलाच सक्रिय झाला आहे. याच दरम्यान अरबी समुद्रात चक्राकार वारे सक्रिय झाल्यामुळे पुढील पाच दिवस मुंबई, ठाणे तसेच कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे या भागातील प्रशासनासह नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

हवामान खात्याच्या माहितीनुसार, सध्या देशात मोसमी पाऊस पडण्यास अत्यंत पोषक वातावरण तयार झाले असून, पुढील पाच दिवस देशाच्या बहुतेक भागांत चांगला पाऊस पडणार आहे. यंदा 24 मे रोजीच मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले होते आणि लगेच दुसऱ्याच दिवशी तो तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाला होता. त्यानंतर सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सध्या सातारा, मुंबई आणि कोकण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून, कोल्हापूरातही जोरदार पाऊस सुरू आहे. राज्यातील विविध भागांत संततधार पाऊस सुरू असून पुढील चार ते पाच दिवस पुणे, मुंबई, सातारा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे किनारपट्टी भागात पावसाळ्यास अधिक पोषक वातावरण निर्माण झाले असून, पुढील काही दिवसांसाठी हवामान विभागाने राज्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

About the Author