महाराष्ट्रातील तब्बल 100 गड किल्ले सर केले; 5 वर्षांच्या जुळ्या बहिणींचा विक्रमी पराक्रम! पुस्तकात असलेला इतिहास प्रत्यक्षात अनुभवला

6 वर्षांच्या जुळ्या बहिणींनी महाराष्ट्रातील तब्बल 100 गड किल्ले सर केले आहेत. पुस्तकात असलेला इतिहास या दोघीजण प्रत्यक्षात अनुभवत आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Mar 25, 2025, 02:41 PM IST
महाराष्ट्रातील तब्बल 100 गड किल्ले सर केले; 5 वर्षांच्या जुळ्या बहिणींचा विक्रमी पराक्रम! पुस्तकात असलेला इतिहास प्रत्यक्षात अनुभवला

Maharashtra Youngest Tracker Presha and Reshvi Kadam : साल्हेर... महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला, कलावंतीण दुर्ग... महाराष्ट्रातील सर्वात  थरारक किल्ला... अनेक मोठ मोठ्या ट्रेकर्स मंडळींसाठी हे किल्ले सर करणे म्हणजे मोठं चॅलेंज असतं. मात्र, फक्त साल्हेर आणि  कलावंतीण दुर्ग नाही तर या सारखे महाराष्ट्रातील तब्बल 100 थरारक गड किल्ले या जुळ्या बहिणींनी सर केले आहेत. अवघ्या 5 वर्षे 11 महिने इतक्या लहान वयात या दोघींनी नवा विक्रम रचला आहे. पुस्तकात असलेला इतिहास या जुळ्या बहिणींनी प्रत्यक्षात अनुभवला आहे. 

23 मार्च 2025 रोजी या जुळ्या बहिणींनी 100 गडकिल्यांची भटकंती पूर्ण करण्याचा विक्रम रचला आहे.प्रेशा कदम आणि रेशवी कदम अशी या जुळ्या बहिणींची नावे आहेत. 3 वर्षाच्या वयात यांनी पहिला विक्रम रचला. फक्त 3 वर्ष वयात स्वतः चढत  विविध 12 गडकिल्ले सर करणाऱ्या भारतातील सर्वात लहान वयाच्या ट्रेकर म्हणून त्यांच्या विक्रमाची नोंद India Book of Records मध्ये झालेली आहे. प्रेशा आणि रेशवी कदम यांनी महाराष्ट्रातील उंच उंच गडकिल्ले या सहजरित्या सर केलेले आहेत. महाराष्ट्रातील सर्वात उंच  कळसुबाई शिखर सुद्धा यांनी सर केलेले आहे.

अडीच वर्षाच्या असल्यापासूनच या दोघींचा दुर्ग भ्रमंतीचा  प्रवास सुरु झाला. 12 महिन्यात कमीतकमी 12 गडकिल्ले या संकल्पनेतून सुरू झालेला हा प्रवास लवकरच सर्वात लहान वयात 100 गडकिल्ले सर करण्याच्या विक्रमापर्यंत पोहचला. आपण जो प्राथमिक इतिहास चौथीमध्ये गेल्यावर शिकलो तेवढा किंवा त्यापेक्षा जास्त इतिहासाची माहिती या दोघींना वयाच्या सहाव्या वर्षी मिळाल्याचे या जुळ्या बहिणींचे वडिल परेश कदम सांगतात. 

प्रेशा आणि रेशवी यांनी साल्हेर, सालोटा , मुल्हेर, मोरागड , माहुली , कलावंतीण , सुधागड , राजगड , रायगड , सिंहगड , पुरंदर , सरसगड , भास्करगड , कोथळीगड , हरिश्चंद्रगड , हडसर , माणिकगड , अशेरीगड , आसावा , चावंड , सागरगड , केंजळगड , विश्रामगड , कर्नाळा यासह महाराष्ट्रातील तब्बल 100 गड किल्ले सर केले आहेत. 

महाराष्ट्रातील गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याच्या आणि पराक्रमाचे साक्षीदार आहेत. प्रेशा आणि रेशवी यांनी जे 100 गड किल्ले सर केले तेथील माती गोळा केली आहे. 23 मार्चला 100 व्या गडाची भटकंती आयोजित केली होती. 35-40 ट्रेकर मंडळी उपस्थित होती. 100 वा दुर्ग सर केला तेव्हा या 100 गड किल्ल्यांची माती एकत्र करुन ती मस्तकी लावण्यात आली. प्रेशा आणि रेशवी यांच्या विक्रमात त्यांच्या आई वडिलांचा मोठा वाटा आहे. एकीकडे लहान मुलं मोबाईलमध्ये अडकली जात असताना प्रेशा आणि रेशवी यांच्या आई वडिलांनी त्यांनी गड किल्ल्यांची भ्रमंती करत प्रत्यक्षात निसर्ग अनुभवण्याची आणि इतिहासाची गोडी लावली.  प्रेशा आणि रेशवी या  डोंबिवली पश्चिम  येथील Blossom International School शाळेत शिकत आहेत.